इटलकर खून प्रकरणी आरोपीस अटक न केल्यास कुटूंब आत्मदहन करणार
आठ दिवसापासून सुरू असलेल्या उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली
मुख्य आरोपी पाच महिन्यांपासून फरार ?
धाराशिव दि.२९ (प्रतिनिधी) – बहिणीची छेड काढणाऱ्याला जाब विचारण्यास इयत्ता दहावीतील मारुती शिवाजी इटलकर हा भाऊ गेला होता. मात्र त्याचा अत्यंत निर्दयपणे संबंधित आरोपींनी खून केला. खून करणाऱ्या मुख्य आरोपीस पोलिसांनी अद्यापपर्यंत अटक केलेली नाही. त्यामुळे त्या आरोपीस अटक करावी, या मागणीसाठी निवेदने, धरणे, आंदोलन व मोर्चा देखील काढला. मात्र आश्वासनाशिवाय पोलिसांनी कुठलीच भूमिका निभावली नाही. विशेष म्हणजे मुख्य आरोपी गावात मोकाट फिरत असताना देखील त्याला पोलीस पकडण्याऐवजी संबंधित पोलीस नातेवाईकांनाच त्या आरोपींना पकडून द्या, असे फर्मान सोडत आहेत. त्यामुळे वडिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले असून आजचा आठवा दिवस असल्याने उपोषणकर्त्याची प्रकृती खालावली आहे. दरम्यान, आमरण उपोषण तात्काळ थांबवा असा दबाव पोलीस आणत आहेत. त्यामुळे जर आरोपीस अटक करण्यास टाळाटाळ केली तर संबंधित पीडित कुटूंब सामूहिक आत्मदहन करणार असल्याचा इशारा इटलकर नातेवाईकांनी दिला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, धाराशिव शहरातील बालाजी नगर येथील शिवाजी सीमाप्पा इटलकर यांच्या मुलीची त्या गल्लीतील सागर प्रवीण चौधरी हा सतत छेड काढत होता. त्याचा जाब तिचा एकुलता एक भाऊ असलेल्या मारुती इटलकर या भावाने विचारला. त्यामुळे मारुतीस गणेश किराणा स्टोअर समोर प्रवीण सुभाष चौधरी, किशोर सुभाष चौधरी, सिद्धनाथ सावंत, अंकुश सुभाष चौधरी, सागर सुभाष चौधरी, रणजीत सुभाष चौधरी व अज्ञात दोन व्यक्तींनी संगणमताने कट रचून मारुतीस दि.८ मे २०२५ रोजी जबर मारहाण केली. त्यामुळे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याचे प्रेत पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आणल्यानंतर अर्ध्या तासात दोन आरोपींना अटक केली. मात्र मुख्य आरोपी रणजीत प्रवीण चौधरी यास गेल्या पाच महिन्यापासून अद्यापपर्यंत अटक केलेली नाही. त्याला अटक करून आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी पोलीस अधिकारी बस्वराज तेली यांच्या अध्यक्षतेखाली एस आय टी गठित करण्यात यावी. शासनाने इटलकर कुटुंबाचे दुसऱ्या ठिकाणी पुनर्वसन करून मुलीस शासकीय नोकरीत सामावून घ्यावे. तसेच मुलींची शिक्षणाची व नोकरीची जबाबदारी शासनाने घ्यावी. संबंधित पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अतिशय बेजबाबदारपणे प्रकरण हाताळलेले आहे. त्यामुळे हलगर्जीपणा केलेल्या संबंधित पोलीस अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी व आरोपी यांच्या मोबाईलचे सीडीआर तपासण्यात यावेत. विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करून खटला विशेष न्यायालयात तात्काळ बोर्डावर घेण्यात यावा या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषणामध्ये शिवाजी इटलकर यांच्यासह आशा इटलकर, महादेव इटलकर, अनुराधा इटलकर, सानिया इटलकर, पूजा इटलकर, आरती इटलकर, कविता इटलकर,मनीषा इटलकर, छकुली इटलकर, तनुजा इटलकर व बजरंग इटलकर आदी सहभागी झाले आहेत.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786












