“साई कला केंद्रावर जिल्हाधिकाऱ्यांचा गंडांतर! अनधिकृत कला केंद्र सील, गुन्हा दाखल करण्याचे आदेश”
परवाना नसताना कला केंद्र सुरु पोलिस अधीक्षकांच्या अहवालावर कारवाई
धाराशिव दि.१६ (प्रतिनिधी):जिल्ह्यात नियमबाह्य पद्धतीने सुरु असलेल्या कला केंद्रांवर प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. आळणी येथील साई लावणी लोकनाट्य कला केंद्र हे परवाना नसताना सुरु असल्याचे उघड झाल्यानंतर जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी हे कला केंद्र तात्काळ सील करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच केंद्र चालकांवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देऊन तहसीलदारांना त्यासाठी प्राधिकृत करण्यात आले आहे.
तहसीलदारांच्या अहवालानुसार साई कला केंद्राला कोणताही अधिकृत परवाना मिळालेला नाही. मूळ संचिकेचे अवलोकन केल्यानंतर प्रशासनाने या केंद्राला अनधिकृत ठरवत तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. जिल्हाधिकारी यांनी नमूद केले आहे की, “या प्रकरणात कोणताही विलंब न करता कार्यवाही पूर्ण करून अहवाल सादर करावा.”
पोलिस अधीक्षक रितु खोखर यांनी या केंद्राविरोधात परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवला होता. त्यांच्या शिफारशीवरून जिल्हाधिकारी यांनी गुन्हा नोंदवण्याचा आणि केंद्र सील करण्याचा निर्णय घेतला आहे. भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून ही कारवाई करण्यात आल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
धाराशिव जिल्ह्यातील विविध ठिकाणी सुरु असलेल्या कला केंद्रांवर प्रशासनाची धडक कारवाई सुरू झाली असून पिंपळगाव येथील तुळजाई, येडशी येथील पिंजरा या केंद्रांचा परवाना रद्द करण्यात आला असून दोन्ही ठिकाणी सील कारवाई करण्यात आली आहे. तर नटरंग व चंद्राई कला केंद्रांचे प्रस्ताव कागदपत्रांत त्रुटी असल्याने फेटाळण्यात आले आहेत. तसेच महाकाली कला केंद्राचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव पोलिस अधीक्षकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला आहे.
धाराशिव तालुक्यातील आळणी, पिंपळगाव, चोराखळी, येडशी परिसरात १२ ते १५ कला केंद्रे कार्यरत असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली आहे. काही ठिकाणी हाणामारी, आत्महत्येस प्रवृत्त करणे, खुनाचे प्रयत्न यासारखे गंभीर गुन्हे घडल्याने पोलिस विभाग सतर्क झाला आहे.
पोलिसांनी अशा केंद्रांना स्पष्ट ताकीद दिली आहे की, बंद खोलीत कार्यक्रम सादर करणे गुन्हा ठरेल. लावणी कार्यक्रम मंचावर व तिकीट पद्धतीनेच सादर करावा, असा नियम असूनही काही केंद्रांमध्ये डीजे लावून बंद खोलीत कार्यक्रम सुरु असल्याचे आढळले. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दबावाला बळी न पडता कारवाई कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
नवीन कला केंद्रांना परवाना मिळावा म्हणून काही सत्ताधारी नेत्यांनी शिष्टमंडळासह पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांची भेट घेतली होती. मात्र, पालकमंत्र्यांनी यावर नाराजी व्यक्त करत “नियम मोडणाऱ्यांना मुभा नाही” असे ठणकावल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
लोकमदत न्यूज “सत्य शोधून लिहिण्याची ताकद”
संपादक अमजद सय्यद 8390088786












