धाराशिव : शहरातील रस्ते विकासाच्या कामांना आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या अंतर्गत वादामुळे शहरातील नागरिकांना विकासापासून वंचित राहावे लागत आहे. परिणामी नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे या रस्त्यांच्या कामांना दिलेली स्थगिती उठवून रस्त्यांच्या कामांना तत्काळ सुरवात करावी यासाठी महाविकास आघाडीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवारी (30 ऑक्टोबर) रास्तारोको आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
यावेळी भाजपा / फडणवीस सरकारचे करायचे काय, खाली मुंडके वर पाय. शहरातील विकास कामे घडविणाऱ्या भाजपा सरकारचा धिक्कार असो. महाविकास आघाडीचा विजय असो. या घोषणा यावेळी आंदोलकांनी दिल्या. यात शहरातील महाविकास आघाडीच्या घटकपक्षांच्या सर्व स्थानिक पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते व नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. आंदोलकांच्या हातात राज्य सरकार विरोधी व स्थगिती उठवण्यासंदर्भात घोषणा फलक होते. आमदार राणा पाटील यांच्या विरुद्धच्या घोषणा झळकविण्यात आल्या.
शहरातील रस्त्यांच्या कामांसाठी नगरोत्थान अभियान अंतर्गत 140 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. या कामांना 23 फेब्रुवारी 2024 रोजी प्रशासकीय मंजुरी प्राप्त झाली आहे. प्रशासकीय मान्यता दिल्यानंतर सात दिवसांच्या आत निविदा काढणे व तीन महिन्यांच्या कालावधीत कार्यारंभ आदेश देणे व प्रत्यक्षात कामे सुरू करणे बंधनकारक आहे. या प्रकल्पाची कार्यान्वित यंत्रणा धाराशिव नगरपरिषद आहे. मात्र गेल्या दीड वर्षांपासून या रस्त्यांच्या कामांना सुरवात करण्यात आलेली नाही. या संदर्भात महाविकास आघाडीच्या वतीने यापूर्वी अनेक निवेदने देण्यात आली, लोकशाही मार्गाने आंदोलने करण्यात आली. 28 एप्रिल 2025 पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आल्यानंतर पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी 30 एप्रिलला उपोषणस्थळी येऊन उपोषणार्थिंची भेट घेऊन चर्चा केली व हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्याने हे उपोषण स्थगित करण्यात आले होते.
दरम्यान रस्त्यांच्या कामाची निविदा कंत्राटदाराने अंदाजपत्रकीय दरापेक्षा 15 टक्के अधिक दराने भरली होती. 15 टक्के अधिकच्या दराने निविदा दिली असती तर नगरपरिषदेवर पर्यायाने शहरातील नागरिकांवर 22 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार होता. म्हणून अंदाजपत्रकीय दरानेच कामे करावीत. ही कामे तत्काळ करावीत. अशी आग्रही भूमिका पूर्वीपासूनच महाविकास आघाडीची आहे.
दरम्यान, जिल्हा नियोजन समितीच्या निधी खर्चामध्ये अनियमितता झाल्याची तक्रार आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी करून नियोजन समितीच्या निधी खर्चाला स्थगिती आणली. तर धाराशिव शहरातील रस्त्यांच्या कामांचे कार्यारंभ आदेश देण्यात आल्यानंतर त्यात अनियमितता असल्याचे कारणावरून पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकरवी या कामांना स्थगिती आणली आहे.
जिल्ह्यातील महायुतीतील या नेत्यांमुळे शहरातील विकासकामांवर परिणाम झाला आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील व पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्यातील अंतर्गत राजकीय कुरघोडीमुळे शहरातील रस्त्यांच्या कामांना विलंब होत आहे. गेल्या दीड वर्षांपासून शहरातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या दोघांच्या कुरघोडीच्या राजकारणात शहराचे वाटोळे होत आहे. या दोघांच्या भांडणामुळे शहरातील नागरिकांना खड्ड्यांमुळे हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. खड्ड्यांमुळे अनेक नागरिक जायबंदी झाले आहेत. त्यामुळे या रस्त्यांच्या कामांना दिलेली स्थगिती उठवून रस्त्यांच्या कामांना तत्काळ सुरवात करावी अन्यथा आगामी काळात यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा देण्यात आला आहे.












