धाराशिव मध्ये पवनचक्की कंपनीच्या केबल चोरी प्रकरणामागे “इन्शुरन्स क्लेम” महा घोटाळा!
कंपनीचे काही प्रमुख अधिकारी, दलाल आणि काही पोलिस अधिकारी यांच्या संगनमताने कोट्यवधींचा बनाव !
धाराशिव दि.१० (अमजद सय्यद) – जिल्ह्यात पवनचक्की माफीयांचे जाळे जोरात व्यापलेले आहे. त्यातच केबल चोरीचे रॅकेटच्या गोरख धंद्यातून कोट्यावधीची माया कमविण्याचा नवा फंडा समोर आला आहे. केबल चोरी झाल्या प्रकरणी धाराशिव शहर पोलीस ठाण्याकडे तक्रार आली. मात्र पोलीस अधिकाऱ्यांनी तक्रारीच्या आधारे गुन्हा नोंद न करता तपास केला. तपासांती आठ दिवसातच ती केबल कंपनी परिसरातच सापडली. सापडल्यानंतर गुन्हा दाखल करणे आवश्यक होते. मात्र, पोलिसांनी तो गुन्हा दाखल केला नाही. या प्रक्रियेमध्ये सर्व अनियमिततेचे सोपस्कार पार पाडले. या प्रकरणी एका महिन्यानंतर संगनमताने त्याच केबल चोरीचा बनाव रचून पुन्हा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. इन्शुरन्स क्लेम करून तेच साहित्य इतर कंपनीस विकतात! विशेष म्हणजे हे साहित्य कंपनीचे काही प्रमुख अधिकारी व दलाल चोरी झाल्याचे दाखवून विमा कंपनीकडून दावा दाखल करुन विमा रक्कम मिळवून कंपनीची देखील फसवणूक करीत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यात पवनचक्की कंपनीचे अधिकारी व दलाल यांची टोळी साहित्य चोरी गेल्याच्या नावाखली कोट्यावधींचा महाघोटाळा करीत असल्याचे समोर आले आहे.!
याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार धाराशिव – तुळजापूर रोड लगत एम एस इ बी, विश्रामगृह समोर सरोजनी आर.ई. सर्व्हिसेस प्रयवेट लिमिटेड पवनचक्की कंपनीचे साहित्य ठेवण्याचे गोडाऊन आहे. या गोडाऊनमधून साठ ते सत्तर लाख रुपये किमतीचे केबल दि.२८-२९ मे २०२५ दरम्यान चोरी गेले. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंद न करताच तपासाची सूत्रे फिरवली. तपास सुरू असतानाच दि. ५ जून रोजी ती केबल कंपनीच्या गोडाऊन परिसरात सापडली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंद करणे अपेक्षित होते. मात्र, संबंधित तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांनी संगणमत करुन तो गुन्हा नोंद केला नसल्याचे सूत्रांनी सांगितले. तर भ्रष्टाचार करण्यात माहीर असलेल्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पुन्हा तीच केबल चोरी झाल्याची तक्रार केली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. त्यामुळे बाहेरच्या बाहेरच कंपनीचे अधिकारी, दलाल व संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी संगणमताने लाखो रुपयांचे भ्रष्टाचाराचे काळे गिफ्ट आपापसात वाटून घेण्यात धन्यता मानली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
अंधारातील काळे कारनामे प्रकाशात येताच…!
अंधारामध्ये सर्व प्रकारचे काळे कारणामे झाकून जातात. यामध्ये काळ्या धंद्याचा म्हणजेच केबल चोरी झाल्याचा बेबनाव देखील काही हात ओले असलेल्या अधिकाऱ्यांनी झाकून घेतला.! मात्र, लांडग्याच्या तोंडाला रक्त लागल्यानंतर तो जसा वारंवार शिकार करण्याचा प्रयत्न करतो. तसाच काहीसा प्रकार केबल कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केला. त्यांनी पुन्हा केबल चोरी गेल्याची तक्रार त्याच पोलीस स्टेशनला दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करा असा दबाव वरच्या स्तरावरून वाढविला गेला. त्यामुळे कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्यांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. त्यामुळे कंपनीचे अधिकारी व दलाल यांची काळ्या करारनाम्याची पोलखोल करण्याचे निश्चित केले. त्यानुसार एके दिवशी संध्याकाळी पेट्रोलिंग करीत असताना धाराशिव शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी यांनी संबंधित कंपनीच्या गोडाऊनला भेट देत पाहणी केली. या दरम्यान त्यांना त्या गोडाऊनमध्ये ज्या केबलची चोरी झाली होती. तसेच त्या चोरी प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तीच केबल एका ताडपत्री खाली व्यवस्थित देखरेखीखाली ठेवली असल्याचे आढळून आल्याने त्यांनी त्याबाबत विचारणा करताच संबंधित अधिकारी व दलालांची बोबडी वळली. त्यांनी प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न केला. मात्र कर्तव्याशी प्रमाणिक असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी सर्व आमिष व दबाव झुगारून देत ते केबल धाराशिव शहर पोलीस ठाण्यात आणले. त्यामुळे पवनचक्की कंपनीचे अधिकारी व दलाल यांचे काळे कारणामे चव्हाट्यावर आले असून जिल्ह्याच्या पोलिस प्रमुखांनी हे संपुर्ण रॅकेट उद्ध्वस्त करण्याचा आदेश दिला आहे.
लोकमदत न्यूज या घटनेचा मुळापर्यंत शोध घेणार असून, या प्रकरणातील नवीन घडामोडींसह भाग २ लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
याव्यतिरिक्त तारीख आणि संगनमत असलेले अधिकाऱ्यांच्या माहितीसह आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांनी जिल्ह्यात आजपर्यंत दाखल केलेल्या सर्व गुन्ह्यासंबंधित सविस्तर बातमी पुढील भागात
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786
















