तुळजापूर : बदनामीचे षडयंत्र रचणारे पोलिसांच्या रडारवर गृहराज्यमंत्र्याकडून आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या लक्षवेधीला उत्तर
तीर्थक्षेत्र तुळजापूरची जाणीवपूर्क बदनामी करणारे सर्वजण आता पोलिसांच्या रडारवर आले आहेत. कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या महंतांनी केलेल्या तक्रारीची मुख्यमंत्री महोदयांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. तीर्थक्षेत्र तुळजापूरच्या बदनामीचे षडयंत्र रचणारांचा शोध घेण्यासाठी पोलिस अधीक्षकांच्या निगराणीखाली चौकशी समिती नेमण्यात आली आहे. पोलिसांचा अहवाल प्राप्त होताच त्या सर्वांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशा शब्दात राज्याचे गृहराज्यमंत्री ना. पंकज भोयर यांनी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सभागृहात उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना सांगितले आहे.
ड्रग्ज प्रकरणाच्या नावाखाली काहीजणांनी जाणीवपूर्वक महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या तीर्थक्षेत्र तुळजापूरच्या बदनामीचे षडयंत्र रचले आहे. समस्त पुजारी आणि सेवेकरी मंडळीची जाणीवपूर्वक बदनामी करून समाजात तेढ निर्माण करण्यासाठी रचलेल्या या षडयंत्राची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी तुळजापूरच्या महंतांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे लेखी तक्रार देत केली होती.त्याअनुषंगाने काय कारवाई झाली याची माहिती घेण्यासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी विधिमंडळात लक्षवेधी उपस्थित केली होती. तुळजापूरच्या महंतांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे केलेल्या तक्रारीचे पुढे काय झाले? तीर्थक्षेत्र तुळजापूर आणि तुळजाभवानी मातेच्या पूजारी वर्गाची जाणीवपूर्वक बदनामी करणाऱ्यांवर राज्य सरकारकडून अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. शासनाने यावर करावयाची कारवाई आणि प्रतिक्रिया काय? असा सवाल आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी उपस्थित केला. त्यावर गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी मुख्यमंत्री महोदयांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली असून पोलिसांना तातडीने प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले असल्याचे सभागृहात उत्तर देताना सांगितले.
वस्तुतः तुळजाभवानी मातेचे तीर्थक्षेत्र जागतिक दर्जाचे धार्मिक पर्यटन केंद्र म्हणून समोर यावे याकरिता महायुती सरकारकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत. वैश्विक दर्जाचे धार्मिक क्षेत्र म्हणून तुळजापूरचा नावलौकिक वरचेवर वाढत आहे. तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासह रेल्वेच्या कामासाठीही सरकारने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. महायुती सरकारच्या कार्यकाळात तुळजापूरसाठी तब्बल दोन हजार २०० कोटी रुपयांपेक्षा अधिकचा निधी प्राप्त होत आहे. रेल्वेसाठी सुमारे तीन हजार कोटी रुपयांच्या आसपास निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामुळे येत्या काळात तुळजापूरचा संपूर्ण कायापालट होणार आहे. ठाकरे सरकारच्या काळात तुळजापूरसाठी एक छदामही मंजूर करण्यात आला नव्हता. त्यामुळेच काही विरोधकांना हे काम बघवत नाही. म्हणून एकत्र येत त्यांनी तुळजापूरच्या बदनामीचे षडयंत्र सुरू केले आहे. तुळजापूर येथील माता भगिनींनी गावातील युवक अंमली पदार्थांच्या विळख्यात येत असल्याची तक्रार आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडे केली होती. त्यानुसार आमदार पाटील यांनी ड्रग्ज प्रकरणी त्यांच्याकडे उपलब्ध झालेली माहिती तात्काळ पोलीस अधीक्षकांपर्यंत पोहचवली. त्यानंतरच पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करीत प्रकरणाचा छडा लावला. आपण दिलेल्या माहितीनंतरच पोलिसांनी ही कारवाई केली. मात्र याच प्रकरणाचा आधार घेत पुजारी वर्गाची आणि तीर्थक्षेत्र तुळजापूरची बदनामी केली जात आहे. तुळजापूरची बदनामी करणारे, समाजात तेढ निर्माण करणारांची उच्चस्तरीय चौकशी समिती गठित करून चाकशी यावी, या समितीचा कालावधी निर्धारित करण्यात यावा. आणि संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे सभागृहात केली होती.












