पालकमंत्री सरनाईकांचे आदेश म्हणजे बोल बोल…धोतर गेलं…! धाराशिवमध्ये अनधिकृत कला केंद्र पुन्हा सुरू?
धाराशिव दि.२४,(प्रतिनिधी):धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वीकारताच राज्याचे परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांनी अनधिकृत कला केंद्रांवर कठोर कारवाईचे आदेश दिले होते. तुळजापूर येथे झालेल्या पहिल्याच आढावा बैठकीत जिल्ह्यात सुरू असलेल्या सर्व अवैध कला केंद्रांची चौकशी करून तात्काळ कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले होते. मात्र, प्रत्यक्षात हे आदेश केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र आज धाराशिव जिल्ह्यात दिसून येत आहे.
लोकमदत न्यूजच्या सातत्यपूर्ण वृत्तप्रसारणामुळे प्रशासनाला साई कला केंद्र, पिंजरा कला केंद्र, गौरी कला केंद्र, कालिका कला केंद्र व तुळजाई कला केंद्र ही पाच केंद्र सील करावे लागले होते. मात्र, कालांतराने त्यातील अनेक केंद्र पुन्हा राजरोसपणे सुरू झाल्याचे वास्तव समोर येत आहे. साई कला केंद्राशी संबंधित एका नृतिकेच्या नादात एकाने चोराखळी परिसरात आत्महत्या केली, तर बीड जिल्ह्यातील एका उपसरपंचाने धाराशिव जिल्ह्यातील एका कला केंद्रातील नृत्यांगनेशी असलेल्या संबंधातून तिच्याच घरासमोर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती.तर उमरगा परिसरात कला केंद्राशी संबंधित काही तरुणींमुळे एका युवकाचा जीव गेला, तर एका केंद्रातील दोन गटांत झालेल्या वादातून गोळीबाराची घटना घडूनही पोलिसांनी केवळ मारहाणीचा गुन्हा दाखल केल्याचे गंभीर आरोप गावकऱ्यांकडून होत आहेत.
या सर्व घटनांमुळे स्पष्ट होते की, कला केंद्र केवळ बेकायदेशीरच नव्हे तर गुन्हेगारी, आत्महत्या, कौटुंबिक उद्ध्वस्तता आणि सामाजिक अस्थैर्याचे केंद्र बनले आहेत. तरीही जिल्हा प्रशासन महसूल व पोलीस प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचे चित्र आहे. धाराशिव जिल्ह्यात अनेक संसार या कला केंद्रांमुळे उद्ध्वस्त झाले, पण संबंधितांवर कठोर कारवाई होताना दिसत नाही.
सध्या धाराशिव जिल्ह्यामध्ये राजरोसपणे अनेक कला केंद्र सुरू असून, येडशी टोलनाका परिसरातील एका केंद्रावर बाहेरून सील असतानाही पाठीमागील खोल्यांमधून महिलांची “पार्टी” उपलब्ध करून देत नृत्याच्या नावाखाली इतर प्रकार खुलेआम सुरू असल्याचा आरोप आहे. ही बाब प्रशासनाच्या माहितीशिवाय शक्य नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमध्ये उमटत आहे.
पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी कला केंद्र बंद करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र स्थानिक प्रशासनाने तो केवळ औपचारिकतेपुरताच मर्यादित ठेवल्याचा आरोप आता उघडपणे केला जात आहे. त्यामुळे “पालकमंत्री सरनाईकांचे आदेश म्हणजे बोल बोल नाऱ्या, धोतर गेलं वाऱ्यावर” अशीच परिस्थिती धाराशिव जिल्ह्यात निर्माण झाल्याचे चित्र आहे.
26 जानेवारी रोजी पालकमंत्री सरनाईक धाराशिव जिल्ह्यात दाखल होत आहेत. महानगरपालिकेच्या कार्यक्रमांतून वेळ मिळाल्यास ते प्रत्यक्षात अनधिकृत कला केंद्रांवर कठोर कारवाई करणार का? आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या महसूल व पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का? असे सवाल आता धाराशिवकर विचारत आहेत.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786












