यावर्षाअखेर एसटी आर्थिकदृष्ट्या सुदृढ होणार ८,३०० नवीन बसेस ताफ्यात” – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
मुंबई | लोकमदत न्यूज
दैनंदिन १ ते १.५ कोटी रुपयांची तूट सहन करत आर्थिक दडपणाखाली असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी)ला नवसंजीवनी देण्यासाठी राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. बसेसची कमतरता दूर करत यंदा तब्बल ८,३०० नवीन बसेस ताफ्यात सामील करण्याचा निर्धार परिवहन विभागाने केला असून, यामुळे प्रवासीसंख्या आणि उत्पन्न दोन्ही वाढतील, असा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.
पुढे बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले की,एसटीच्या दीर्घकालीन धोरणानुसार पुढील काही वर्षांत २० ते २५ हजार बसेस खरेदी करण्याचा मानस असून त्यास तत्वतः मान्यता मिळाली आहे. त्यातील पहिल्या टप्प्यात ८,३०० बसेस दाखल होणार आहेत. यामध्ये ३,००० ‘३x२’ आसन रचनेच्या ५५ आसनी बसेस मार्चपासून टप्प्याटप्प्याने ताफ्यात येणार असून त्यांना ‘राजमाता जिजाऊ साहेब’ यांचे नाव देण्यात येणार आहे. या बसेस दोन शहरांदरम्यानच्या गर्दीच्या मार्गांवर धावणार आहेत. तसेच ५,००० साध्या बसेसची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. दुर्गम व आदिवासी भागांसाठी १०० मिडी बसेस आणि खाजगी वाहतुकीशी स्पर्धा करण्यासाठी २०० अत्याधुनिक बसेसही खरेदी केल्या जाणार आहेत.
सध्या एसटीचा दैनंदिन खर्च ३४ ते ३५ कोटी रुपये असून उत्पन्न सुमारे ३३ कोटी रुपये आहे. त्यामुळे दररोज १ ते १.५ कोटी रुपयांची तूट सहन करावी लागत आहे. नवीन बसेस ताफ्यात आल्यानंतर दररोज ७० ते ७५ लाख प्रवासी वाहतुकीचे लक्ष्य गाठण्याचा महामंडळाचा मानस आहे. बसेस वाढल्या तर प्रवासी वाढतील आणि प्रवासी वाढले तर उत्पन्नही वाढेल, असा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे.
एसटी ही नफा कमावणारी संस्था नसून राज्यातील सर्वसामान्यांसाठी जीवनवाहिनी आहे. मात्र खर्च आणि उत्पन्नाचा समतोल साधत किमान तोटा टाळणे गरजेचे आहे. नव्या ताफ्यासह ‘लालपरी’ पुन्हा एकदा नव्या जोमाने राज्याच्या कानाकोपऱ्यात धावेल आणि यावर्षाअखेर एसटी आर्थिक गर्तेतून बाहेर येईल, असा विश्वास देखील सरनाईक यांनी व्यक्त केला आहे.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक अमजद सय्यद 8390088786












