धाराशिव जिल्हा परिषदेत सत्तासंघर्ष शिगेला आ.सावंतांच्या हालचालींनी राजकीय पट तापला
सासरवाडीतून अजितदादांना ‘आदरांजली’? शिंदेसेनेकडून अध्यक्षपदाची ऑफर? धाराशिव मध्ये नवे समीकरण!
धाराशिव / लोकमदत न्यूज
धाराशिव जिल्हा परिषदेत सत्तास्थापनेचा तिढा कायम असतानाच पडद्यामागील हालचालींना वेग आला आहे. ५५ सदस्यीय सभागृहात सर्वाधिक १९ जागांसह भाजप पहिल्या क्रमांकावर असला, तरी स्पष्ट बहुमतापासून दूर आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटांची एकत्रित ताकद, राष्ट्रवादी अजित पवार गटाची निर्णायक भूमिका आणि अपक्षांचे महत्त्व यामुळे अध्यक्षपदाची शर्यत चुरशीची बनली आहे.
भाजपकडून अध्यक्षपदावर आपलाच दावा कायम ठेवत तेर गटातून विजयी झालेल्या अर्चना राणाजगजितसिंह पाटील यांचे नाव पुढे केल्याची चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर विविध सदस्यांसोबतचे फोटो प्रसारित करत ‘धक्का तंत्र’ वापरले जात असल्याचे विरोधकांचे आरोप आहेत. सर्वात मोठा पक्ष म्हणून सत्ता स्थापनेचा हक्क भाजपचाच, असा सूर त्यांच्या नेत्यांकडून उमटतो आहे.
दुसरीकडे, शिंदे गटानेही आक्रमक भूमिका घेतली आहे. माजी मंत्री आमदार प्रा. तानाजीराव सावंत यांनी मुंबईत नेतृत्वाशी सलग चर्चा केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. जिल्हा परिषदेतील सत्तागणिते, संभाव्य आघाड्या आणि भाजपच्या हालचालींबाबत त्यांनी सविस्तर आढावा दिल्याचे सांगितले जात आहे. सत्ता स्थापनेची सूत्रे सावंत यांच्या हाती सोपवली गेल्याची कुजबुज राजकीय वर्तुळात सुरू आहे.
या सगळ्या समीकरणांत राष्ट्रवादी अजित पवार गट ‘किंगमेकर’ ठरू शकतो. सहा सदस्यांच्या बळावर अध्यक्षपदाची ऑफर या गटाला देण्यात आल्याची जोरदार चर्चा आहे. धाराशिव हा अजित पवार यांचा सासरवाडीचा जिल्हा असल्याने ‘सासरवाडीतून आदरांजली’ या राजकीय प्रतिमेलाही उधाण आले आहे. अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे गेल्यास तो निर्णय केवळ सत्तासमीकरण न राहता प्रतीकात्मक संदेश ठरेल, असे मत व्यक्त केले जाते.
दरम्यान, संभाव्य फुट टाळण्यासाठी प्रमुख पक्षांनी सदस्यांना ‘सेफ झोन’मध्ये ठेवण्याची रणनीती आखल्याचे दिसते. सहली, बैठकांची मालिका आणि बंद दाराआडच्या चर्चा यामुळे वातावरण अधिकच तापले आहे. अंतिम क्षणी कोण बाजी मारणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
अध्यक्षपदाची निवडणूक जवळ येत असताना राजकीय पटावर अनिश्चिततेचे ढग दाटले आहेत. सावंतांच्या पुढील हालचाली, राष्ट्रवादीची भूमिका आणि अपक्षांचे गणित यावरच धाराशिव जिल्हा परिषदेतील सत्तेचे चित्र अवलंबून राहणार, हे मात्र निश्चित. पुढील काही दिवसांत जिल्ह्याच्या राजकारणात नवे समीकरण आकार घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786












