तुळजाभवानी कृषि महोत्सवाचे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्या हस्ते ऑनलाइन उद्घाटन
धाराशिव | लोकमदत न्यूज
महाराष्ट्र शासन कृषि विभाग, आत्मा विभाग व महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘श्री तुळजाभवानी कृषि महोत्सव, धाराशिव – २०२६’ या उपक्रमाचे उद्घाटन आज विधान भवन येथून ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्या हस्ते झाले.
शेतकऱ्यांची शाश्वत प्रगती, शेतीमालाला योग्य बाजारभाव आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार या उद्देशाने या कृषि महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी बोलताना पालकमंत्री सरनाईक यांनी सांगितले की, हा कृषि महोत्सव २४ व २५ फेब्रुवारी दरम्यान तुळजापूर येथे पार पडणार असून धाराशिव जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी या महोत्सवात आवर्जून सहभागी व्हावे.
हवामान बदल, वाढता उत्पादन खर्च आणि बदलती बाजारपेठ यांसारख्या आव्हानांचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना सक्षम करणे हा या महोत्सवाचा प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आधुनिक शेती तंत्रज्ञान, पीक व्यवस्थापन, सेंद्रिय शेती, प्रक्रिया उद्योग आणि बाजारपेठेतील संधी याबाबत तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
कृषि क्षेत्रातील नामांकित तज्ज्ञ, अधिकारी व विविध संस्थांचे प्रतिनिधी या महोत्सवात सहभागी होणार असून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष संवादातून मार्गदर्शन मिळणार आहे. अशा उपक्रमांमुळे जिल्ह्यातील शेती अधिक उत्पन्नक्षम, शाश्वत आणि स्पर्धात्मक बनेल, असा विश्वासही पालकमंत्री सरनाईक यांनी व्यक्त केला.
‘श्री तुळजाभवानी कृषि महोत्सव – २०२६’ हा उपक्रम जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ज्ञान, तंत्रज्ञान आणि बाजारपेठेच्या संधींचा सेतू ठरणार असल्याचे चित्र आहे.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786













