उपमुख्यमंत्री शिंदे यांची आ. राणा पाटील यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या शिष्टमंडळाने घेतली भेट
पहिल्यांदाच जिल्हा परिषदेवर कमळ उमलणार !
धाराशिव – लोकमदत न्यूज
जिल्हा परिषदेच्या खुर्चीवर भारतीय जनता पार्टी व घटक पक्षाची बहुमताने सत्ता येणार हे निश्चित झाले आहे. त्यामुळे मित्रचे उपाध्यक्ष आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी शिष्टमंडळासह शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची विधीमंडळात भेट घेतली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी महायुतीची सत्ता स्थापन करण्यासाठी असलेला संभ्रम दूर झाला आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष व विद्यमान जिल्हा परिषद सदस्य अर्चनाताई पाटील यांचीच वर्णी लागणार असल्याचे निश्चित झाले आहे. दरम्यान, नूतन जिल्हा परिषद सदस्य सुनील बनसोडे यांना मोठी जबाबदारी मिळणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल दि.७ फेब्रुवारी रोजी लागला. या निवडणुकीमध्ये मतदारांनी कोणालाही स्पष्ट बहुमत दिले नाही. मात्र, या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे – १९ तर शिवसेना (शिंदे) – १५, शिवसेना (ठाकरे) – ७, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार) – ६, काँग्रेस पक्ष – ३, समाजवादी पार्टी – १ आणि अपक्ष – ४ असे ५५ सदस्य निवडून आलेले आहेत. मात्र, निकाल लागल्यानंतर पक्षाच्या नेत्यांनी आपापल्या उमेदवारांना सहलीवर नेले. त्यातच माजी मंत्री आमदार प्रा डॉ तानाजी सावंत यांनी शिवसेनेचाच अध्यक्ष होणार अशी भूमिका घेतली. त्यानंतर महायुतीत प्रचंड तणाव वाढला होता. त्यामुळे दररोज बहुमताचा आकडा गाठण्यासाठी भाजप व शिवसेनेमध्ये दावे – प्रती दावे करण्यात येऊ लागले. तर आ राणाजगजितसिंह पाटील यांनी बहुमताचा आकडा जुळण्यासाठी भाजपच्या सदस्या बरोबरच राष्ट्रवादी व अपक्षांना देखील सोबत तर घेतलेच. त्याबरोबरच शिवसेना (शिंदे) च्या दोन सदस्यांना देखील आपल्या कळपात सामील करून घेत बहुमताची पर्यायाने सत्तेची समीकरणे जुळविली. तर उमरगा व लोहारा या तालुक्यातील शिवसेना नेते माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड व माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी भाजपबरोबर जाण्याची भूमिका घेतली. मात्र, या नेत्यांपैकी कोणीही समोरासमोर येऊन चर्चा करण्यास तयार नव्हते. भाजप व शिवसेना आमच्याकडे बहुमत असल्याचा दावा देखील करु लागले. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी मोठा संभ्रम निर्माण झाला होता.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री प्रताप सरनाईक व शिवसेना उपनेते माजी आमदार राजन साळवी यांची आमदार राणाजगजितसिंह पाटील, माजी आमदार ज्ञानराज चौगुले, भाजपाचे युवा नेते मल्हार पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान सदस्य धनंजय सावंत, सुनील बनसोडे यांच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन जिल्हा परिषद सत्ता स्थापन करण्या संदर्भात सविस्तर चर्चा केली असल्याचे सांगण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी देखील सत्ता स्थापनेसाठी हिरवा कंदील दाखवला असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. आज झालेल्या भेटीमुळे दि.१३ मार्चला जिल्हा परिषदेच्या खुर्चीवर कमळ उमलणार हे जवळपास निश्चित झाले आहे.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक अमजद सय्यद 8390088786














