जिजाऊ चौक ते बोंबले हनुमान चौक रस्त्यासाठीचे आमरण उपोषण स्थगित!
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या आश्वासनानंतर मुंढे यांचे उपोषण मागे!
धाराशिव | लोकमदत न्यूज
शहरातील जिजाऊ चौक (बार्शी नाका) ते बोंबले हनुमान चौक या अतिदुरावस्थेतील रस्त्याच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी सुरू केलेले आमरण उपोषण अखेर पाचव्या दिवशी स्थगित करण्यात आले. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दूरध्वनीवरून दिलेले आश्वासन तसेच नगराध्यक्ष नेहा काकडे, बांधकाम सभापती अभिजित काकडे आणि उप मुख्याधिकारी यांनी तीन महिन्यांत काम पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर दिनकर उर्फ दादासाहेब वसंतराव मुंडे यांनी रविवारी (दि. १ मार्च) आपले उपोषण मागे घेतले.
दि. २५ फेब्रुवारीपासून मुंडे यांनी संबंधित रस्त्यावरच आमरण उपोषण सुरू केले होते. या रस्त्याची गेल्या अनेक वर्षांपासून अक्षरशः चाळण झाली असून मोठमोठे खड्डे, साचलेला फुफाटा आणि उडणारी धूळ यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असून वारंवार अपघात होत आहेत. परिसरात शैक्षणिक संकुले असल्यामुळे विद्यार्थ्यांनाही धोका निर्माण झाला आहे.
या संदर्भात परिसरातील नागरिकांनी नगर परिषद व जिल्हा प्रशासनाकडे अनेकदा लेखी व तोंडी मागण्या केल्या; मात्र केवळ आश्वासनांपलीकडे कोणतीही ठोस कारवाई झाली नव्हती. दरम्यान, बसस्थानक ते हनुमान चौक मार्गे बार्शी नाका या रस्त्याचे काम सुरू असताना तेच काम जिजाऊ चौक ते बोंबले हनुमान चौकपर्यंत वाढवावे, अशी ठाम मागणी मुंडे यांनी केली होती. त्यांनी मुख्याधिकारी, जिल्हाधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याकडेही लेखी निवेदन दिले होते; मात्र प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला.
उपोषणाची दखल घेत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी तीन महिन्यांत निधी उपलब्ध करून रस्ता काम सुरू करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर बांधकाम सभापती अभिजित काकडे, नगरसेवक राहुल काकडे, नगरसेवक सुजित साळुंखे, नगर परिषद उप मुख्याधिकारी तथा आरोग्य निरीक्षक अभिजित गोरे यांच्यासह अधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी भेट देऊन तीन महिन्यांत काम पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले.
प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर मुंडे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते नारळपाणी घेऊन उपोषण स्थगित केले. यावेळी उपमुख्याधिकारी गोरे, नगरसेवक राहुल काकडे, सुजित साळुंके तसेच डॉ. संतोष मुळे, डॉ. दत्ता बुर्ले, डॉ. सुभाष वाघ, आबा मुंडे, चंद्रजित जाधव, शीतल देशमुख, मोहन मुंडे, प्रमोद देशमुख, नानासाहेब बोराडे, प्रितम मुंडे, कृष्णा मुंडे, रवींद्र अंबुरे, पांडुरंग लाटे, बापू खुणे, अशोक उंबरे, सुनील पंगूडवाले, विश्वजित देशमुख, बुबा उंबरे, दादा पाटील, तानाजी माने, बालाजी सुरवसे, दत्ता शेवाळे, बिरू ढगारे, गणपत घोडके, रामा पिंगळे, विजय धोंगडे, संभाजी आहेर आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786













