लवकरच शहरवासियांना उजनी सोबत तेरणा धरणाचे पाणी मिळणार – सभापती लोंढे
रेल्वे लाईनच्या कामामुळे फुटलेल्या पाइपलाईनच्या तात्काळ दुरुस्ती
धाराशिव – लोकमदत न्यूज
धाराशिव शहराला उजनी धरणाच्या पाण्याचा पुरवठा होत आहे. मात्र दूरवरून येणारे पाणी त्यातच वारंवार विद्युत प्रवाहाचा खंड आणि वारे बावधन यामुळे पाणी उचलण्यास अनेक अडथळे निर्माण होत आहेत. परिणामी त्याचा थेट परिणाम शहरातील पाणी वितरण व्यवस्थेवर होत आहे. त्यामुळे आ राणाजगजितसिंह पाटील, मल्हार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे यांच्या अध्यक्षतेखाली तेरणा धरणातून पाईपलाईन आणण्याचे युद्ध पातळीवर काम सुरू आहे. तीच पाईपलाईन उपळा शिवारातील धरण परिसरात फुटल्याने त्याची पाहणी करून दुरुस्ती करून घेण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. त्यामुळे शहरातील पाणी टंचाईचे संकट लवकरच दूर होणार असल्याची माहिती पाणी पुरवठा सभापती विलास लोंढे यांनी दिली.
लोंढे यांनी नगर परिषदेच्या सभागृहात शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीस माजी नगरसेवक बापू पवार, पाणीपुरवठा अभियंता संग्राम भापकर, सहाय्यक पाणीपुरवठा अभियंता रोहित मुंडे, पाणीपुरवठा अधिकारी विकास माने यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते, या बैठकीमध्ये सभापती लोंढे यांनी उजनी धरणातून आवश्यक पाणी का येत नाही ? याची माहिती पाणीपुरवठा अभियंता संग्राम भापकर यांच्याकडून जाणून घेतली. त्यावेळी अधिकाऱ्यांनी उजनी धरणातून थेट धाराशिवला पाणी उचलले जात नसून ते तीन पंपग्रहांमध्ये सोडले जाते. त्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणाहून विद्युत पुरवठा होत आहे. तेथील लोड शेडिंग किंवा विद्युत पुरवठा करण्यामध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्यास मोठा विलंब लागत असल्याचे सांगितले. त्यामुळे पाणी पुरवठ्यामध्ये व्यत्यय येत असल्याने पाण्याची टंचाई निर्माण होत आहे. ही टंचाई दूर करण्यासाठी तेरणा धरणातून पाणी उचलण्यासाठी पाईपलाईनचे काम रात्रंदिवस युद्ध पातळीवर सुरू आहे. हे काम सुरू असतानाच उपळा शिवारातील तलावानजीक रेल्वे मार्गामुळे पाईपलाईन फुटली. त्यामुळे सभापती लोंढे यांनी त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांसह त्या ठिकाणास भेट दिली. तसेच ती पाईपलाईन तात्काळ दुरुस्त करून घेतली असून या पाईपलाईनचे काम पूर्ण झाल्यानंतर आणि टेस्टिंग केल्यानंतर तेरणा धरणातून पाणी दररोज वेळेवर उचलण्यास कुठलीही अडचण येणार नाही. त्यामुळे शहरवासियांना देखील सुरळीतपणे पाणी पुरवठा होणार असल्याचे लोंढे यांनी सांगितले. तसेच नागरिकांना पाणी वेळेवर पुरवठा करण्यासाठी नगर परिषदेचे प्रयत्न सुरू असून कुठल्याही प्रकारची पाणी टंचाई निर्माण होणार नसल्याचे लोंढे यांनी सांगितले.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786












