श्री क्षेत्र तुळजापूर येथे होणारा श्री तुळजाभवानी देवीचा शारदीय नवरात्र महोत्सव यंदा दिनांक २२ सप्टेंबरपासून मोठ्या उत्साहात प्रारंभ होत आहे. परंपरेनुसार त्याआधी १४ सप्टेंबर रोजी देवींची मंचकी निद्रा सुरू होणार असून, २२ सप्टेंबर रोजी घटस्थापना होईल. भाविकांच्या वाढत्या गर्दीचा विचार करून जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली.
नवरात्र काळात भाविकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून विद्युत विभागाकडून २४ तास अखंडित वीजपुरवठा करण्यात येणार आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून भाविकांना रस्त्यावरील अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी शहरात येणाऱ्या प्रमुख रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तसेच भाविकांच्या सोयीसाठी मराठी, कन्नड व तेलगू भाषेत दिशादर्शक फलक लावले जात आहेत.
आरोग्य विभागाच्या वतीने भाविकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी शहरात येणाऱ्या सहा प्रमुख मार्गांवर २२ प्रथमोपचार केंद्रे उभारण्यात येणार आहेत. तसेच साथरोग नियंत्रण पथके नियुक्त केली जाणार असून गर्दीच्या ठिकाणी १० बाईक ॲम्ब्युलन्सही सज्ज राहतील.
नगर परिषदेच्या वतीने शहरातील स्वच्छता मोहिमेला विशेष गती देण्यात आली आहे. भाविकांसाठी पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था, अग्निशमन वाहन, वॉच टॉवर, तसेच ३ ठिकाणी विश्रांतीगृहांची उभारणी करण्यात येणार आहे. प्लास्टिक विक्रीवर बंदी घालून प्लास्टिक बंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल. यंदा सुरक्षेच्या दृष्टीने शहरात १०२ ठिकाणी CCTV कॅमेरे बसवले जात आहेत. तसेच भवानी कुंड परिसरात शौचालय सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
अन्न व प्रशासन विभागाच्या वतीने भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने २० अन्न सुरक्षा अधिकारी कार्यरत राहतील आणि खाद्यपदार्थांवर काटेकोर देखरेख ठेवली जाणार आहे.
भाविकांच्या सुरक्षिततेसाठी २ हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात येणार आहे. याशिवाय वाहतूक नियोजनासाठी स्वतंत्र पथके कार्यरत राहतील.
*जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिपादन*
या बैठकीत जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार म्हणाले की,
“यावर्षीचा शारदीय नवरात्र महोत्सव हा स्वच्छता संकल्पनेवर आधारित असेल. देवीच्या दर्शनासाठी आलेला प्रत्येक भाविक सुखरूप घरी जाईपर्यंत त्याची काळजी घेणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे.”
एकूणच, तुळजापूरात शारदीय नवरात्र महोत्सवाच्या तयारीला मोठा वेग आला असून, भाविकांच्या सुरक्षेसह स्वच्छता, आरोग्य आणि सोयी-सुविधांवर प्रशासनाकडून विशेष भर दिला जात आहे.
जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी ज्योती पाटील, उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख, तहसीलदार अरविंद बोळंगे, तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने, महंत तुकोजी बुवा, पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमराजे कदम, विपिन शिंदे, अनंत कोंडो व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.












