पालकमंत्री प्रतापराव सरनाईक दोन दिवस धाराशिव जिल्हा दौऱ्यावर; जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष म्हणून विकास निधीवरील स्थगिती उठणार का याकडे लक्ष
धाराशिव, दि. १२ (प्रतिनिधी) : राज्याचे परिवहन मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक हे दोन दिवसांच्या धाराशिव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या या दौऱ्यामुळे जिल्ह्यातील विविध विकासकामांबाबत महत्त्वाचे निर्णय अपेक्षित असल्याने सर्वांचे लक्ष या दौऱ्याकडे लागले आहे.
मंगळवार, दि. १६ सप्टेंबर रोजी दुपारी १.१५ वाजता सरनाईक सोलापूर शासकीय विश्रामगृहातून खाजगी वाहनाने धाराशिवकडे रवाना होतील. दुपारी २.१५ वाजता तुळजापूर येथे आगमन होऊन शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त विविध स्थळांची पाहणी व आढावा ते घेणार आहेत. सायंकाळी ५.३० वाजता तुळजाभवानी मंदिरातून खाजगी वाहनाने ते धाराशिवकडे प्रयाण करतील. संध्याकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत शासकीय विश्रामगृह, धाराशिव येथे आगमन होऊन शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक होईल. रात्री ९ वाजता ते शासकीय विश्रामगृहात मुक्काम करतील.
बुधवार, दि. १७ सप्टेंबर रोजी सकाळी ८.२५ वाजता शासकीय वाहनाने ते जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना होतील. सकाळी ८.३५ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आगमन होऊन सकाळी ८.४५ वाजता मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या ७७ व्या वर्धापन दिन कार्यक्रमास ते उपस्थित राहतील. त्यानंतर सकाळी १० वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाकडे रवाना होऊन १०.१० वाजता तिथे आगमन करतील. उम्मीद निदान केंद्र व रक्त साठवण केंद्राचे उद्घाटन मंत्री सरनाईक यांच्या हस्ते होणार आहे.
सकाळी १०.५० वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून छत्रपती शिवाजी महाराज चौक, धाराशिव येथे प्रयाण होऊन सकाळी ११ वाजता ध्वज उभारणी कार्यक्रमाच्या ४५ मीटर ध्वजस्तंभ भूमिपूजनास ते उपस्थित राहतील. दुपारी १ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातून ते त्यांच्या निवासस्थानकडे ठाण्याकडे रवाना होतील.
या दौऱ्यातील कार्यक्रमांसोबतच जिल्ह्याच्या विकासाशी निगडित महत्त्वाचे प्रश्न देखील ऐरणीवर आले आहेत. मागील चार ते पाच महिन्यांपासून जिल्हा नियोजन समितीच्या निधीला स्थगिती देण्यात आली असून, त्यामुळे विकासकामांवर ब्रेक लागला आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री सरनाईक यांच्या दौऱ्यात स्थगिती उठवली जाणार का, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी ते काय नियोजन मांडतात, तसेच ऐन वेळी नियोजन समितीची आढावा बैठक घेऊन कोणते निर्णय घेतले जातील का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
जिल्ह्यातील नागरिक, लोकप्रतिनिधी व प्रशासन या सर्वांचे लक्ष आता या दौऱ्याकडे लागले आहे.
लोकमदत न्यूज “सत्य शोधून लिहिण्याची ताकद”
संपादक अमजद सय्यद 8390088786












