‘महाकाली कला केंद्रा’तून गावाकडे जाणाऱ्या तरुणाचा जुन्या भांडणातून केला खून !
पालकमंत्र्याचे आदेश अडकले कला केंद्रातील ‘त्या घुंगरात’ !
धाराशिव / लोकमदत न्यूज
जिल्ह्यात कला केंद्रांचा पुन्हा नंगानाच सुरु झाला आहे. जिल्ह्यातील कला केंद्र बंद करावीत तसेच नियमानुकुल करावीत असे आदेश पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी जिल्हा प्रशासनाला दिलेले होते. जिल्हा प्रशासनाने देखील तोंड देखलेपणा करीत काही कला केंद्रांना नोटिसा बजावीत कागदोपत्री नियमानुकूल बंद असल्याचा बेबान केला. पालकमंत्र्यांच्या आदेशाची अंमलबजावणी काटेकोरपणे करणे गरजेचे आहे. मात्र त्याची अंमलबजावणी होत नसल्याने ते आदेश कला केंद्रातील त्या कोणत्या ‘घुंगरात’ अडकले आहेत ? विशेष म्हणजे या काही कला केंद्रामध्ये रात्रभर ‘नंगा’नाच केला जात असल्याचे बोलले जात आहे. त्यांना कोणाचीच भीती व धाक राहिलेला नसल्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून विविध प्रकारामुळे गाजत असलेल्या… कला केंद्राने… पुन्हा एका तरुणाचा बळी घेतला असल्याची दुर्दैवी घटना दि.१२ ते १३ फेब्रुवारी दरम्यान घडली आहे. चोराखळी येथील महाकाली कला केंद्रातील कार्यक्रम बंद आहे ? दरम्यान, या कला केंद्रातील कला पाहून गावाकडे परतणाऱ्या बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील एका ३७ वर्षीय तरुणास मागील भांडणाची कुरापत काढीत त्याच्यासोबत आलेल्या पाचजणांनी लाथा-बुक्क्यांनी ठेचून त्याचा निघृन खून केला आहे. त्यामुळे या कला केंद्रात नेमके कोणाच्या परवानगीने किती वाजेपर्यंत चालतात याचे गौडबंगाल जिल्हावासियांसमोर येणे अत्यावश्यक बनले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील साळेगाव येथील सतीश भागवत मुंडे (वय – ३७ वर्षे) हे साळेगाव येथीलच शेख अजमोद्दीन उर्फ मुन्ना शेख जिलानी, शेख शकील रौफ, संजय जनार्धन गिते, मधुकर गोरोबा इंगळे व दत्ता बाबासाहेब तोंडे यांच्याबरोबर दि.१२ कळंब तालुक्यातील चोराखळी येथील महाकाली कला केंद्रात तेथील नयन चाळे पाण्यासाठी गेले होते. कार्यक्रम पाहिल्यानंतर ते सतीश मुंडे यांच्यासह सर्वजण मिळून साळेगावकडे वाहनांमध्ये जात होते. दरम्यान, शेख अजमोद्दीन उर्फ मुन्ना शेख जिलानी, शेख शकील रौफ, संजय जनार्धन गिते, मधुकर गोरोबा इंगळे व दत्ता बाबासाहेब तोंडे या पाच आरोपींनी सतीश मुंडे याच्याबरोबर जुन्या भांडणाची कुरापत काढून मुंडेला जीवे मारण्याच्या उद्देशाने महाकाली कला केंद्रापासून साळेगाव दरम्यानच्या रस्त्यातच दि.१२ फेब्रुवारी रोजी रात्री ११.३० ते दि. १३ फेब्रुवारी दरम्यान दुपारी २ वाजेपर्यंत त्याच्या छाती आणि पोटावर लाथा व बुक्क्यांनी जबर मारहाण करून एक प्रकारे ठेचण्याचाच प्रकार केला. त्यामुळे मुंडेला त्या निष्ठूर सैतानांनी ठार केले. याप्रकरणी येरमाळा पोलीस ठाण्यात मुंडेचे वडील भागवत बळीराम मुंडे (वय – ७९ वर्षे) व्यवसाय शेती यांनी दिलेल्या तक्रारीवरून दि.१५ फेब्रुवारी रोजी गु. र.न.- ३८/२०२६ कलम १०३ (१), १९१ (२), ११५ (२) भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास येरमाळा पोलीस ठाण्याचे प्रभारी सपोनि भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि भोजगुडे हे करीत आहेत.
हे प्रकरण अतिशय गंभीर व जिल्हावासियांसाठी चिंतेचा विषय बनलेला आहे. पालकमंत्री सरनाईक याबाबत काय भूमिका घेतात आणि जिल्हावासियांना या नरक यातनेतून केव्हा व कसे मुक्त करणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786












