धाराशिव (प्रतिनिधी):धाराशिव जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या विशेष पथकाने सोमवारी धाराशिव शहरातील मध्यवर्ती भागात सुरू असलेल्या अवैध पत्त्याच्या क्लबवर धाड टाकून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करत दहा जणांना अटक केली. या कारवाईनंतर शहरातील अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत. या धाडसी मोहिमेचे सर्वत्र कौतुक होत असुन हे ‘ स्पेशल ‘ पथक कायमस्वरूपी निर्माण करून अवैध धंद्याचा कर्दनकाळ ठरावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
धाराशिव शहरासह जिल्ह्यात सुरू असणाऱ्या अवैद्य धंद्यावर अशा धडक प्रकारच्या कारवाया केवळ स्वतंत्र पथकाद्वारेच शक्य आहेत. जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या धाराशिव शहरात इतका मोठा क्लब मध्यवर्ती भागात सुरू असतानाही स्थानिक पोलिसांना त्याची माहिती नसणे किंवा असूनही दुर्लक्ष करणे? हे गंभीर व चिंताजनक आहे. त्यामुळेच या पथकाच्या कारवाईनंतर स्थानिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर थेट प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दरम्यान, या कारवाईनंतर शहरातील इतर भागांमध्ये सुरू असलेल्या अवैध क्लब मालकांचे धाबे दणाणले आहेत. सोलापूर रोडवरील बांगड ऑईल मिल परिसरात, तसेच बेंबळी रोडवरील भरवस्तीत देखील अशाच प्रकारचे क्लब सुरू असल्याचे चर्चा आहे, मात्र, हे क्लब सोमवारी झालेल्या कारवाईमुळे ते तात्पुरते बंद करण्यासाठी सांगितले असल्याचे बोलले जात आहे. या क्लबमुळे परिसरातील नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गोंधळ, वाहनांची गर्दी, रात्री उशिरापर्यंत सुरू राहणारा अवाज यामुळे नागरिक त्रस्त झाले असून स्थलांतर करावे लागण्याची वेळ आली असल्याचे नागरिक दबक्या आवाजात सांगत आहेत.
विशेष म्हणजे, धाडीनंतर अटक केलेल्या क्लब मालकाने पोलिस ठाण्यातच गोंधळ घातल्याची माहितीही दबक्या आवाजात सुरू असल्याचे दिसून येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, काही स्थानिक पोलिस कर्मचारी क्लबकडून ठराविक रक्कम घेत असल्याचीही चर्चा सुरू आहे.यातील “मुंगळा” बनून गुळ खाणाऱ्या एका कर्मचाऱ्याने क्लब मालकाकडून ऑनलाइन व्यवहाराद्वारे पैसे घेतल्याचे सांगत ते पैसे परत मागण्यामुळे गोंधळ उडाला होता. मात्र ठरलेली रक्कम पूर्ण दिल्यानंतर देखील कारवाई झाल्याने संतप्त क्लब मालकाने पोलिस ठाण्यात गोंधळ घालून पैसे परत मागितल्याची चर्चा रंगली. या सर्व प्रकरणाचा जिल्ह्यामध्ये लेडी सिंघम म्हणून ओळखले जाणारे प्रभारी पोलीस अधीक्षकांनी सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.
प्रभारी पोलिस अधीक्षक शफाकत आमना यांच्या नेतृत्वाखाली अल्पावधीत विशेष पथकाने धाड घालून मोठी कारवाई केल्याने त्यांनी नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे. त्यांची जिल्ह्यात “लेडी सिंघम” म्हणून ओळख निर्माण होत आहे. त्यामुळे आता हे विशेष पथक कायमस्वरूपी स्थापन करून शहरात सुरू असलेले सर्व अवैध धंदे बंद करावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
धाराशिव शहरात हळूहळू ऑनलाइन जुगाराचा शिरकाव होऊ लागल्याची माहितीही पुढे येत आहे. वेळेत कारवाई झाली नाही तर भविष्यातील पिढी या व्यसनाधीनतेच्या जाळ्यात अडकण्याची भीतीही नागरिकांनी व्यक्त केली आहे.
अवैध धंद्यांना स्थानिक पातळीवरील अधिकारी- कर्मचारी यांच्यातील काहींचे पाठबळ आहे? त्यामुळे त्यांची विभागीय चौकशी होऊन कारवाई झाली तरच नागरिकांचा पोलिसांवरील असलेला विश्वास अधिक दृढ होईल. अपर पोलिस अधीक्षकांनी स्थापन केलेले हे स्वतंत्र पथक कायमस्वरूपी केले गेले पाहिजे. यामुळे अवैध धंद्यांवर आळा बसून नागरिकांचा पोलिस प्रशासनावरील विश्वास दृढ होण्यास मदत होईल.

लोकमदत न्यूज “सत्य शोधून लिहिण्याची ताकद” संपादक अमजद सय्यद 8390088786











