नियमभंग, गुन्हे आणि तक्रारींचा पाढा ‘महाकाली’ कला केंद्र ला सीलचा दणका जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
बंद कला केंद्र चालकांचा पुढाऱ्यांना हाताशी धरून निवेदने, मोर्चे, गावबंदची तयारी करून प्रशासनावर दबाव टाकण्याचा प्रयत्न?
धाराशिव | लोकमदत न्यूज
कळंब तालुक्यातील चोराखळी येथील बहुचर्चित आणि अनेक महिन्यांपासून वादग्रस्त ठरलेले “महाकाली” सांस्कृतिक लोकनाट्य कला केंद्रावर अखेर प्रशासनाने कठोर कारवाई करत तात्काळ स्थगितीचे आदेश जारी केले आहेत. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी महसूल विभाग, पोलीस प्रशासन आणि उपविभागीय अधिकाऱ्यांच्या पाहणी अहवालाच्या आधारे हा निर्णय घेतला आहे. संबंधित परवाना धारक राजाभाऊ सीताराम माळी यांना याबाबत लेखी आदेश देण्यात आले आहेत.
यापूर्वी तुळजाई, पिंजरा, साई, कालिका आणि गौरी अशी पाच कला केंद्रे कायमस्वरूपी बंद करण्यात आली होती. त्यानंतर सुरू असलेले महाकाली हे एकमेव कला केंद्रही कारवाईच्या कक्षेत आले आहे. विशेष म्हणजे, ७ फेब्रुवारी २०२३ रोजी राजाभाऊ माळी यांनी कला केंद्र सुरू करण्यासाठी अर्ज केला होता; मात्र २८ एप्रिल २०२३ रोजी तो अर्ज नामंजूर करण्यात आला होता. तरीही केंद्र सुरू असल्याचा ठपका प्रशासनाने ठेवला आहे.
२३ ऑगस्ट २०२५ रोजी पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी सादर केलेल्या अहवालानुसार, महाकाली कला केंद्र अक्षय साळुंखे यांना भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्यात आले होते. परवान्याच्या अटींनुसार पारंपरिक वाद्यांवर सादरीकरण अपेक्षित असताना प्रत्यक्षात साउंड सिस्टीमवर नृत्य सादरीकरण होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. कलाकारांची संपूर्ण माहिती, कागदपत्रे आणि आवश्यक नोंदी वारंवार मागवूनही सादर करण्यात आल्या नसल्याचे अहवालात स्पष्ट केले आहे.
५ ऑगस्ट २०२५ रोजी कला केंद्रासमोर दोन गटांत झालेल्या भांडणप्रकरणी येरमाळा पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता २०२३ मधील विविध कलमान्वये गुन्हा दाखल आहे. एकूण सहा गुन्ह्यांची नोंद असल्याचे प्रशासनाने नमूद केले असून भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी १६ फेब्रुवारी २०२६ रोजी दिलेल्या अहवालात रिट याचिकेचा अंतिम निकाल लागेपर्यंत केंद्र सील करण्याची शिफारस केली होती.
१२ जानेवारी २०२६ रोजी कळंब उपविभागीय अधिकाऱ्यांनी केलेल्या प्रत्यक्ष पाहणीत गंभीर नियमभंग उघड झाले. कला केंद्राच्या इमारतीच्या बांधकामासंदर्भात कोणतेही वैध परवाने आढळले नाहीत. अंदाजे ५० आर क्षेत्रावर उभारलेले बांधकाम अनधिकृत असल्याचे नमूद करण्यात आले. प्रवेश आणि निर्गमनासाठी स्वतंत्र मार्ग नसणे, नियमानुसार रंगमंचाची व्यवस्था नसणे, प्रेक्षकांसाठी बसण्याची योग्य सोय नसणे, १० वातानुकूलित खोल्यांमध्ये नृत्य सादरीकरण होणे, छापील तिकिटे व जीएसटी नोंदणी नसणे, कलाकारांची संपूर्ण माहिती लेखी स्वरूपात पोलीस ठाण्यास न दिले जाणे, तसेच भिंतीला लागून बिअर बार व लॉजिंग व्यवसाय सुरू असल्याच्या बाबी अहवालात नमूद आहेत. ग्रामसभेचा वैध ठराव सादर नसल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे.
या सर्व बाबींचा एकत्रित विचार करून जिल्हाधिकाऱ्यांनी कला केंद्र तात्काळ स्थगित ठेवण्याचे आदेश दिले असून, पुढील काळात कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी परवाना धारकावर राहील, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी जिल्ह्यातील अनधिकृत कला केंद्रांवर कारवाईचा इशारा दिला होता. “जिल्ह्यात एकही बेकायदेशीर कला केंद्र सुरू राहणार नाही,” अशी भूमिका त्यांनी जाहीरपणे मांडली होती. सद्य कारवाईमुळे त्या भूमिकेची अंमलबजावणी सुरू असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
महाकाली कला केंद्राच्या कारभाराबाबत सातत्याने तक्रारी प्राप्त होत होत्या. स्थानिक पातळीवर वाढते वाद, भांडणप्रकरणे आणि नियमभंगाच्या मुद्द्यांमुळे प्रशासनाने अखेर निर्णायक पाऊल उचलले आहे. जिल्ह्यातील सहापैकी पाच कला केंद्रे यापूर्वीच सील करण्यात आली असून महाकाली केंद्रावरील कारवाईनंतर सर्व अनधिकृत केंद्रांवर पूर्णविराम लागल्याचे चित्र आहे.
तर बंद असलेल्या काही कला केंद्र चालकांकडून विविध मार्गांनी प्रशासनावर दबाव आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याची ग्रामीण भागात चर्चा आहे. गावबंद, निवेदने आणि आंदोलने करण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासन सक्षम असल्याचे संकेत मिळत आहेत.
जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, पोलीस अधीक्षक रितू खोकर आणि पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्या समन्वयातून झालेल्या या कारवाईचे जिल्हाभरातून स्वागत होत असून, कायद्याचा धाक प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने ही निर्णायक पायरी मानली जात आहे.
लोकमदत न्यूजचा इम्पॅक्ट!
अनधिकृत आणि नियमबाह्य कला केंद्राच्या वादग्रस्त कारभाराबाबत लोकमदत न्यूजने वेळोवेळी ठोस वृत्तांकन करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. स्थानिक नागरिकांच्या तक्रारी, भांडणांचे प्रकार, नियमभंग आणि अनधिकृत कारभार यावर सातत्याने प्रकाश टाकल्यानंतर प्रशासनाने तातडीने कारवाई केल्याचे स्पष्ट दिसत आहे.
लोकमदत न्यूजच्या पाठपुराव्यामुळेच प्रशासन हालचालीला लागले, अशी चर्चा नागरिकांमध्ये रंगली असून नागरिकांनी विशेष आभार मानले.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786












