धाराशिव दि.०७(प्रतिनिधी):धाराशिव तालुक्यातील जुनोनी येथील तरुण शेतकरी मुन्ना आयुब शेख (वय 38 वर्षे) याने सततच्या पावसामुळे पिकांचे झालेले नुकसान, वाढता कर्जाचा डोंगर आणि घरखर्चाचा ताण सहन न झाल्याने गुरुवारी सायंकाळच्या सुमारास शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. परिसरातील शेतकऱ्यांनी त्याला तात्काळ धाराशिव येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.
मयत मुन्ना शेख यांचे गेल्यावर्षी वडील आयुब शेख यांचे दीर्घ आजाराने निधन झाले होते. त्या वेळी उपचारासाठी खाजगी सावकाराकडून आणि बँकेकडून सुमारे पाच लाख रुपये कर्ज घेण्यात आले होते. यावर्षी मुन्ना यांनी आपल्या तीन एकर कोरडवाहू शेतजमिनीत सोयाबीनची पेरणी केली होती. परंतु सततच्या पावसामुळे संपूर्ण पीक पाण्यात गेले. त्यातच सावकार व बँकेचे हप्ते, मुलांच्या शिक्षणाचा खर्च व घरखर्च कसा भागवायचा, या विवंचनेतून नैराश्य वाढले. शेवटी टोकाचे पाऊल उचलत त्याने आत्महत्या केली.
मयत मुन्ना शेख यांच्या पश्चात आई, पत्नी, तीन मुली, एक मुलगा व एक लहान भाऊ असा मोठा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने जुनोनी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांचा दफनविधी गुरुवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास जुनोनी येथील कब्रस्तानात करण्यात आला.
लोकमदत न्यूज “सत्य शोधून लिहिण्याची ताकद”
संपादक अमजद सय्यद 8390088786












