आठवडी बाजारातील घाणीचा कहर नागरिकांचे आरोग्य धोक्यात, ‘रील स्टार’ स्वच्छता सभापतींवर नागरिक संतप्त!
धाराशिव – लोकमदत न्यूज
जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या धाराशिव शहरातील आठवडी बाजारात सध्या घाणीचे अक्षरशः साम्राज्य पसरले असून, नाले, सांडपाणी / संडास आणि कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळच भाजीपाला व फळांची विक्री होत असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ताजी व आरोग्यदायी समजून घेतली जाणारी भाजी येथे ‘विषासमान’ ठरत असल्याची तीव्र प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहे.
नगरपरिषदेकडून आठवडी बाजारासाठी स्वतंत्र जागा व सिमेंटचे कट्टे तयार करून देण्यात आले असतानाही बहुतांश विक्रेते मुख्य रस्त्यावरच गाड्या लावून व्यवसाय करत असल्याने वाहतुकीचा मोठा अडथळा निर्माण होत आहे. परिणामी वाहतूक कोंडी, किरकोळ अपघात आणि वादांचे प्रमाण वाढले असून, नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आतमध्ये प्रशस्त बाजारपेठ रिकामी असताना रस्त्यावरच बाजार भरत असल्याने नियोजनाचा पूर्णपणे अभाव (फज्जा उडत) असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
अधिक गंभीर बाब म्हणजे नाल्यांच्या कडेला, सांडपाण्याच्या ठिकाणी भाजीपाला विक्री होत असून, अनेक ठिकाणी डुक्कर व इतर जनावरे त्या भाज्यांवर ताव मारताना दिसतात. त्याच भाजीपाला पुन्हा ग्राहकांना विकला जात असल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले असून, काही व्हिडिओही समोर आले आहेत. अशा परिस्थितीत धाराशिवकरांच्या अन्नात रोज ‘घाणीचा बुस्टर डोस’ मिसळला जात असल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
दरम्यान, नगरपरिषद निवडणुकीवेळी स्वच्छता, सुविधा आणि नियोजनाचे मोठमोठे आश्वासन देण्यात आले होते. आठवडी बाजार विकसित करण्यासाठी सुमारे 12 कोटी रुपयांची कामे मंजूर होऊनही ती आजतागायत रखडलेली आहेत. सत्ता बदलानंतर या कामांना स्थगिती मिळाल्याने हा प्रश्न गेली चार वर्षे प्रलंबित असून, फक्त आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
विशेष म्हणजे, स्वच्छतेच्या नावावर मोठा गाजावाजा करणारे ‘रील स्टार’ स्वच्छता सभापती (नगरसेवक) यांनी 5 जानेवारी 2026 रोजी अधिकाऱ्यांसह आठवडी बाजाराची पाहणी करून सर्व समस्या तात्काळ सोडवण्याची घोषणा केली होती. मात्र तीन महिने उलटूनही परिस्थिती जैसे थेच असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. शहरात केवळ रील्स आणि प्रसिद्धीसाठी स्वच्छता मोहीम राबवली जात असल्याचा गंभीर आरोप होत असून, प्रत्यक्षात घाणीचे साम्राज्य कायम असल्याचे वास्तव समोर आले आहे.
याउलट, नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांनी या गंभीर प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन ठोस पावले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे. आठवडी बाजारातील जागा तातडीने स्वच्छ करून, पाणी, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि नियोजित विक्री यासाठी ठोस उपाययोजना केल्यासच नागरिकांना दिलासा मिळू शकतो. शहराच्या आरोग्याशी निगडित असलेल्या या प्रश्नावर प्रशासनाने पुढाकार घेऊन आदर्श निर्माण करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
धाराशिवकरांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या प्रकाराकडे आता दुर्लक्ष करून चालणार नाही. स्वच्छता सभापतींनी केवळ रिल्स काढण्याएवढाच दिखावा न करता प्रत्यक्ष कामगिरीतून जबाबदारी सिद्ध करावी, तर नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांनी पुढाकार घेत आठवडी बाजाराचा चेहरामोहरा बदलावा अशी मागणी शहरवासीयांतून होत आहे.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक अमजद सय्यद 8390088786

















