प्रभाग 18 मध्ये पॅनल एक… पण नेते दोन दिशेला! ‘तुझं माझं जमेना, तुझ्या बिना करमेना’ अशी राजकीय गत…
धाराशिव : नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 18 हा शहरातील सर्वाधिक चर्चेत आलेला प्रभाग ठरत आहे. या प्रभागात दोन नगरसेवक निवडून देण्यात येणार असून ‘अ’ जागा ही ना.मा.प्र. महिलांसाठी राखीव तर ‘ब’ जागा सर्वसाधारण आहे. या दोन्ही जागांसाठी एकाच पक्षाचे पॅनल उभे असले तरी या पॅनल मधील दोन नेत्यांमध्ये जुनाट राजकीय वैर असल्याचे उघडपणे दिसून येत असल्याचे समोर येत आहे.
आजपर्यंत एकमेकांचे तोंड न पाहणारे हे दोन्ही नेते यंदा तांत्रिकदृष्ट्या एका पॅनेलमध्ये असले तरी प्रत्यक्षात मात्र दोघांच्या स्वतंत्र प्रचारयंत्रणा, स्वतंत्र बैठक अशा ‘दोन तंबूंचे’ चित्र प्रभागात असल्याचे म्हटले जात आहे. एक नेते स्वतः उमेदवार असून दुसऱ्या नेत्याची पत्नी उमेदवार म्हणून रिंगणात आहे. दोघांकडूनही “मला मत द्या” अशी स्वतंत्र मागणी होत असल्याचे दिसून येत असून मतदार संभ्रमात असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.
प्रभागातील नागरिक संभ्रमात असून आता उघडपणे बोलत आहेत की “यांना एकमेकांवरच विश्वास नाही, तर निवडून आल्यावर विकास कसा करणार?”
मागील काही दिवसांपासून दोघांमध्ये धुसफूस वाढली असून त्यांच्या कार्यकर्त्यांमध्येही अस्वस्थता निर्माण झाली आहे. या फुटीचा सरळ फायदा प्रभागातील प्रतिस्पर्धी उमेदवार यांना फायदा होऊ शकतो अशी चर्चा रंगू लागली आहे. प्रतिस्पर्धी उमेदवारांनी दमदार प्रचारयुद्ध छेडल्याने पॅनेलची फुट अधिकच ठळक झाली आहे.
विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, काल सायंकाळी एका ठिकाणी पक्षाच्या वरिष्ठांच्या उपस्थितीत दोन्ही नेत्यांची तातडीची गुप्त बैठक घेण्यात आली. त्यामध्ये “निवडणूक होईपर्यंत तरी एकत्र काम करा, पॅनेल एक आहे हे दाखवा” अशी स्पष्ट ताकीद देण्यात आली आहे. मात्र ही एकता खरी ठरणार की फक्त कागदोपत्री राहणार, याबाबत स्थानिकांमध्ये शंका निर्माण झाली आहे.
“प्रभाग 18 मध्ये तुझं माझं जमेना, तुझ्या बिना करमेना!”
दोन्ही नेत्यांची स्थिती अशी की ना सोबत राहवतंय, ना सोडवतंय… आणि याचा थेट परिणाम पॅनेलच्या मतविभाजनावर होत असल्याचे स्थानिकांमध्ये बोलले जात आहे. जर अशीच परिस्थिती राहिली, तर दोघांच्या कलहाचा फायदा प्रतिस्पर्धी उमेदवारांना मिळणे अपरिहार्य असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
निवडणुकीची रणधुमाळी चूरशीला पोहोचत असताना प्रभाग क्रमांक 18 मध्ये आतल्या आत सुरू असलेला असाच ‘मौनसंग्राम’ निवडणुकीतील सर्वात महत्वाचा मुद्दा ठरू लागला आहे.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक अमजद सय्यद 8390088786












