“लालपरी’ अधिक सुरक्षित होणार एसटीच्या सुरक्षेसाठी ₹१११ कोटींचा सीसीटीव्ही प्रकल्प – प्रताप सरनाईक परिवहनमंत्री
लोकमदत न्यूज / धाराशिव
राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’च्या सुरक्षेसाठी आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे बळ मिळणार आहे. संभाव्य दहशतवादी व समाजविघातक प्रवृत्तींच्या धोक्यांचा विचार करून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) ने ‘नवीन सीसीटीव्ही प्रकल्प’ हाती घेतला असून, या माध्यमातून राज्यभरातील एसटीच्या महत्त्वाच्या ठिकाणी डिजिटल नजर ठेवण्याची व्यापक व्यवस्था उभारण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी राज्य शासनाने तब्बल ₹१११ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे.
या निधीतून एसटीची बसस्थानके, आगार, विभागीय कार्यशाळा, मध्यवर्ती कार्यशाळा, विभागीय कार्यालये तसेच मध्यवर्ती प्रशिक्षण संस्था भोसरी यांसारख्या संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. एकूण ६३३ ठिकाणी ७०३५ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार असून, त्यामुळे एसटीच्या कामकाजावर २४ तास केंद्रीकृत पद्धतीने नजर ठेवता येणार आहे.
या प्रकल्पाचा मुख्य कणा ठरणारा अत्याधुनिक मध्यवर्ती नियंत्रण कक्ष मुंबई येथे उभारण्यात आला असून, त्याची वापरकर्ता स्वीकृती चाचणी (UAT) यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. या नियंत्रण कक्षातून राज्यभरातील सर्व कॅमेऱ्यांचे थेट निरीक्षण केले जाणार आहे. कोणतीही संशयास्पद हालचाल तात्काळ ओळखून संबंधित यंत्रणेला माहिती देणे व त्वरित कार्यवाही करणे शक्य होणार आहे.
प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत हा प्रकल्प राबविण्यात येत असल्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले. ‘नवीन सीसीटीव्ही प्रकल्प’ हा केवळ कॅमेरे बसविण्याचा उपक्रम नसून, एसटीच्या सुरक्षेला डिजिटल कवच देणारा आणि प्रवाशांच्या विश्वासाला नवे बळ देणारा महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले. या उपक्रमामुळे ‘लालपरी’चा प्रवास अधिक सुरक्षित, विश्वासार्ह आणि तंत्रज्ञानसज्ज होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक अमजद सय्यद 8390088786












