परवाना रद्द पण पिंजरा कला केंद्र सुरुच!
“पिंजरा सांस्कृतिक लोकनाट्य कला केंद्र” बंद करण्याच्या आदेशानंतरही प्रशासन मौन! नागरिकांचा संतप्त सवाल : “कागदोपत्री रद्द की प्रत्यक्षात?”
धाराशिव दि. ११ ऑक्टोबर (प्रतिनिधी) :धाराशिव तालुक्यातील आळणी येथील गट.नं. ३३३ वर सुरू असलेल्या “पिंजरा सांस्कृतिक लोकनाट्य कला केंद्र” चा परवाना नियमभंग केल्याने जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या आदेशान्वये ९ ऑक्टोबर रोजी रद्द करण्यात आला होता. मात्र परवाना रद्द होऊन तब्बल दोन दिवस उलटून गेले तरीही सदर कला केंद्र अद्यापही सुरु असल्याचे चित्र दिसत आहे!प्रशासनाच्या या कार्यवाहीबाबत नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार सदर कला केंद्राने परवाना देताना घालण्यात आलेल्या अटींचे उल्लंघन केले होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासात अनेक अनियमितता उघड झाल्यानंतर धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. १९२/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम २२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाने नियम क्र. २२६ (ii) नुसार परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतला होता.
मात्र परवाना रद्द झाल्यानंतरही प्रत्यक्ष पातळीवर कोणतीही सीलिंग कारवाई झाली नसल्याने “प्रशासनाने केवळ कागदोपत्री कारवाई केली का?” असा संतप्त प्रश्न परिसरात असलेल्या गावांतील नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे.
नागरिकांनी आरोप केला की जर परवाना रद्द करणे हा अंतिम निर्णय असेल, तर संबंधित स्थळ सील करण्याची आणि सर्व कार्यक्रम बंद करण्याची प्रक्रिया “तात्काळ” व्हायला हवी होती. मात्र, दोन दिवस उलटून गेल्यानंतरही कोणतेही पथक कारवाईसाठी न आल्याने प्रशासनाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
काही नागरिकांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, “९ ऑक्टोबरला परवाना रद्द केल्याची बातमी आली, पण कला केंद्र अजूनही सुरु आहे. प्रत्यक्ष कारवाई न केल्याने प्रशासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी केवळ कागदोपत्रीच राहिली आहे,” असे म्हणत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, जिल्हा प्रशासनाकडून पुढील कारवाईबाबत अद्याप अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही. नागरिकांचा प्रशासनाला प्रश्न “परवाना रद्द झाला, पण सील कधी करणार?”
या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यातील सांस्कृतिक केंद्रांवर प्रशासनाची पुढील भूमिका काय असेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
लोकमदत न्यूज “सत्य शोधून लिहिण्याची ताकद”
संपादक अमजद सय्यद 8390088786











