लाडक्या बहिणींच्या अर्जांतील त्रुटी मिशन मोडवर दूर करा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे प्रशासनाला निर्देश
धाराशिव / लोकमदत न्यूज
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ जिल्ह्यातील प्रत्येक पात्र बहिणीला मिळालाच पाहिजे, त्यासाठी आता जिल्हा प्रशासनाला ‘मिशन मोड’वर लाडक्या बहिणींच्या अर्जातील तांत्रिक त्रुटी आणि चुकीच्या माहितीमुळे रखडलेली ३८ हजार ८११ बहिणींची ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर आता प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे.
जिल्ह्यात मोठ्या संख्येने माता भगिनींनी लाडकी बहीण या योजनेसाठी अर्ज केले आहेत. मात्र, तब्बल ३८ हजार ८११ अर्जांमध्ये माहिती भरताना चुका झाल्याचे समोर आले आहे. यामुळे या माता भगिनींची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. पर्यायाने त्यांच्या बँक खात्यात योजनेचे पैसे जमा होण्यास अडथळा निर्माण झाला आहे. हक्काच्या आर्थिक मदतीपासून लाडक्या बहिणी वंचित राहू नयेत, यासाठी ही विशेष मोहीम हाती घेण्याबाबत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी निर्देश दिले आहेत. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी जिल्हाधिकारी डॉ. कीर्ती किरण पूजार यांना हे प्रकरण प्राधान्याने हाताळण्याच्या सूचना दिल्या. प्रशासनाने याची तत्काळ दखल घेतली असून, शनिवारी या संबंधित सर्व यंत्रणांची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत प्रलंबित ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी विशेष कृती आराखडा तयार करून करण्याबाबत स्पष्ट निर्देश दिले जाणार आहेत.
एकाही पात्र भगिनी वंचित राहता कामा नये : आमदार पाटील
जिल्ह्यातील अनेक माता-भगिनी केवळ तांत्रिक कारणास्तव योजनेच्या लाभापासून वंचित आहेत, हे चिंताजनक आहे. प्रशासनाने समन्वयाने काम करून या त्रुटी लवकरात लवकर दूर कराव्यात. महिलांनीही आपल्या गावातील ग्रामसेवक किंवा अंगणवाडी सेविकांशी संपर्क साधून आपले ई-केवायसी अपडेट करून घ्यावे असे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.












