*एनव्हीपी शुगरची अल्पावधीत उत्कर्षाकडे झेप – संदीपान महाराज हासेगावकर*
*एनव्हीपी शुगरच्या दुसऱ्या गळीत हंगामाचा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ*
धाराशिव –
एनव्हीपी शुगर या कारखान्याने अल्प कालावधीत सूक्ष्म नियोजन आणि शेतकऱ्यांचा विश्वास या बळावर उत्कर्षाकडे झेप घेतली आहे, असे प्रतिपादन
आळंदी देवाची येथील वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व परीक्षक संदीपान महाराज हासेगावकर यांनी केले.
धाराशिव तालुक्यातील जागजी येथील एनव्हीपी शुगर प्रा. लि. या कारखान्याच्या द्वितीय गळीत हंगामाचा शुभारंभ रविवारी (दि. 5) संदीपान महाराज हासेगावकर आणि जनता बँकेचे अध्यक्ष हभप वसंतराव नागदे यांच्या हस्ते कारखाना स्थळी करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जागजी येथील प्रगतशील शेतकरी रंगनाथ सावंत, तर प्रमुख पाहुणे म्हणून उमरगा- लोहारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रवीण स्वामी, माजी नगराध्यक्ष तथा शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख मकरंद राजेनिंबाळकर, कडकनाथवाडी येथील विश्वनाथ पाटील, लेखा परिक्षक सचिन शिंदे, टेंभुर्णी येथील स्वराज ट्रॅक्टरचे वितरक हिम्मतराव पाटील, उमरगा- लोहारा विधानसभेचे युवा नेते अजिंक्य बाबा पाटील हे उपस्थित होते.
हासेगावकर महाराज म्हणाले की, कारखान्याचे चेअरमन नानासाहेब पाटील हे उद्योग क्षेत्रात जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिकपणे काम करत आहेत, त्यामुळेच कारखान्याची प्रगतीकडे वाटचाल सुरू आहे. संत गोरोबा काकांच्या भूमीत औद्योगिक प्रगती पाहून समाधान वाटते. कारखान्याची पुढील काळात भरभराट होवो, असे शुभाशीर्वाद त्यांनी यावेळी दिले.
*चेहरा आणि चारित्र्य पाहूनच कारखाना चालतो – वसंतराव नागदे*
वसंतराव नागदे यांनी, साखर कारखाना हा चेहरा आणि चारित्र्य पाहूनच चालत असतो असे सांगून विश्वास नसला तर शेजारी कारखाना असला तरी शेतकरी त्यांना ऊस न देता दूरच्या कारखान्याला ऊस देतो असे ते म्हणाले. एनव्हीपी शुगरच्या वतीने शेतकऱ्यांना वेळेवर बिल दिले जाते याचा आनंद वाटतो. ग्रामीण भागात उद्योगधंदे सुरू होत नाहीत तोपर्यंत शेतकऱ्यांची प्रगती होणार नाही. चेअरमन नानासाहेब पाटील यांच्या अनुभवामुळे यावर्षीचा गळीत हंगाम आणखी चांगला होईल असेही त्यांनी सांगितले.
*एनव्हीपी शुगरची टॉपच्या कारखान्यात नोंद होईल अा. प्रवीण स्वामी*
आमदार प्रवीण स्वामी म्हणाले, साखर कारखाना म्हटले की आपण पश्चिम महाराष्ट्राकडे बघतो. पण आता मराठवाडा विशेषतः धाराशिव आणि लातूर जिल्ह्यातील काही कारखान्यांनी आदर्श साखर कारखाना कसा असावा याचे उदाहरण इतर कारखान्या समोर ठेवले आहे. त्यातीलच एक म्हणजे एनव्हीपी शुगर हा कारखाना आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस कारखान्याला गेला की लवकर बिल मिळावे ही अपेक्षा असते. शेतकऱ्यांची ही गरज लक्षात घेऊन एनव्हीपी शुगरने अवघ्या पंधरा दिवसांत बिल शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करून आदर्श घालून दिला आहे. त्यामुळे एनव्हीपी शुगरची पुढील काळात टॉपच्या कारखान्यात नोंद होईल असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
*एनव्हीपी शुगरचे नियोजन चांगले – मकरंद राजेनिंबाळकर*
मकरंद राजेनिंबाळकर म्हणाले, एनव्हीपी शुगर गेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांसाठी तत्परतेने काम करत आहे. आपण महाराष्ट्रातील अनेक साखर कारखान्यांची पाहणी केली. त्या कारखान्यांच्या तुलनेत एनव्हीपी शुगरचे नियोजन चांगले दिसून येते. ज्या ठिकाणी शेतकऱ्यांची लक्ष्मी नांदते. तो भाग स्वच्छ आणि सुंदर असला पाहिजे यावर कारखान्याचा भर आहे. पुढील काळात चेअरमन नानासाहेब पाटील यांचे नियोजन अधिक प्रभावी होईल. राजे साहेबांच्या परिवारातील हा पहिला कारखाना असून लवकरच आपण बार्शी तालुक्यात कारखाना सुरू करत आहोत, तो राजे साहेबांच्या परिवारातील दुसरा कारखाना असेल, असेही ते म्हणाले.
*अतिवृष्टीमुळे आडव्या झालेल्या उसाची देखील नोंद – नानासाहेब पाटील*
प्रास्ताविकात चेअरमन नानासाहेब पाटील म्हणाले, एनव्हीपी शुगरच्या उभारणी पासून कारखान्याने वेळेवर ऊस तोडणी आणि वेळेवर बिल देण्याचा उपक्रम सुरू ठेवला आहे. तोच उपक्रम यावर्षी आणि यापुढेही कायम राहील. यंदा अतिवृष्टीमुळे उसाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे आडव्या झालेल्या उसाची देखील नोंद घेण्याचे नियोजन केले आहे. यावर्षी दीड ते पावणेदोन लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. सध्या आणखी पाऊस झाला असल्यामुळे वाहने रानात जाऊ शकत नाहीत. म्हणून पुढील दहा दिवसांनंतर ऊस तोडणी सुरू होईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी कारखान्याचे मार्गदर्शक अप्पासाहेब व्यंकटराव पाटील,
चेअरमन नानासाहेब व्यंकटराव पाटील, कार्यकारी संचालक कृष्णा नानासाहेब पाटील, धनंजय व्यंकटराव पाटील, चिफ इंजिनिअर ओंकार मोकाशे, चिफ केमिस्ट उमेश बिक्कड, मुख्य शेतकी अधिकारी जयवंत रोहिले यांच्यासह ऊस वाहतूक ठेकेदार, शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम टाळून खासदार अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीला
गळीत हंगामाच्या शुभारंभ कार्यक्रमाला निमंत्रित करण्यात आलेले खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी कार्यक्रम टाळून कालच्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्तांना मदतीसाठी धावून गेले. त्यांच्या या कर्तव्यदक्ष कामगिरीचा उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणात कौतुक करून गौरवोद्गार काढले.













