तर धाराशिव जिल्हा परिषदेवर भाजपाशिवाय सत्ता स्थापन करणार
आ. तानाजीराव सावंत ठरणार का ‘किंगमेकर’?
धाराशिव लोकमदत न्यूज
जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर होताच सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला असून, अध्यक्षपदाच्या निवडीभोवती महायुतीतच जोरदार रस्सीखेच सुरू झाल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर भूम-परंडा-वाशीचे आमदार तानाजीराव सावंत यांची भूमिका निर्णायक ठरणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. शिवसैनिकांकडून तर “आ. सावंत यांना सोबत घेतल्याशिवाय सत्ता समीकरणे पूर्ण होऊ शकत नाहीत,” असा ठाम दावा करण्यात येत आहे.
५५ सदस्यांच्या जिल्हा परिषदेत भाजप १९ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी शिवसेना एकनाथ शिंदे गट (१५), शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष (८), राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार गट (६), काँग्रेस (३), समाजवादी पक्ष (१) आणि अपक्ष (३) अशा विखुरलेल्या आकडेवारीमुळे अध्यक्षपदासाठी बहुमताची बेरीज हीच खरी कळीची ठरणार आहे. सत्ता महायुतीकडे झुकते आहे, हे जवळपास स्पष्ट असले तरी अध्यक्षपदावरून दावे-प्रतिदावे केले जात आहेत.
भाजपकडून अध्यक्षपदावर ठाम दावा केला जात असताना, शिवसेना शिंदे गटानेही आक्रमक पवित्रा घेतला आहे. पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी अध्यक्षपद शिवसेनेकडेच येईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. संपर्कप्रमुख राजन साळवे यांनीही “शिवसेनेचाच अध्यक्ष झाल्यास आनंदच होईल,” असे म्हणत पक्षाची भूमिका अधोरेखित केली. याच सूरात आ. तानाजीराव सावंत यांनी “जिल्हा परिषद अध्यक्ष हा शिवसेनेचाच आणि धनुष्यबाणाचाच होणार,” असा ठाम दावा करत राजकीय चर्चांना उधाण आणले आहे.
दुसरीकडे, भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनीही अध्यक्षपदासाठी हालचाली सुरू केल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. मात्र, सावंत गटाच्या पाठबळाशिवाय सत्ता समीकरणे जुळवणे कठीण असल्याचे निरीक्षण व्यक्त केले जात आहे. शिवसैनिकांकडून भाजपच्या दाव्यांवर जोरदार टीका होत असून, “वेळ पडल्यास भाजपशिवायही शिवसेनेचा अध्यक्ष होऊ शकतो,” असा राजकीय इशारा देण्यात येत आहे.
सध्या जिल्ह्यात आघाड्या-जोडण्या, पाठिंब्यांचे गणित आणि अंतर्गत चर्चांना वेग आला आहे. अध्यक्षपदाच्या निवडीपूर्वी पडद्यामागील हालचाली अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकंदरित, या राजकीय पटावर आ. तानाजीराव सावंत हे ‘किंगमेकर’ ठरतात का, आणि धनुष्यबाणाचा भगवा जिल्हा परिषदेत फडकतो का, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. आगामी काही दिवसांत धाराशिवच्या राजकारणात महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक अमजद सय्यद 8390088786












