यात्राकाळात एसटीची उत्पन्नवाढीकडे वाटचाल येरमाळा,शिंगणापूर, तुळजापूर,पंढरपूर यात्रेसाठी २०६ जादा बस फेऱ्यांवर भर
विभाग नियंत्रक अजय पाटील यांचे प्रभावी नियोजन भाविकांना सुलभ प्रवासासह एसटीच्या उत्पन्नवाढीकडे वाटचाल
धाराशिव | लोकमदत न्यूज
चैत्री यात्राकाळ लक्षात घेऊन धाराशिव विभागात राज्य परिवहन महामंडळाने व्यापक आणि नियोजनबद्ध तयारी केली असून भाविकांच्या सोयीसाठी तब्बल 206 जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.राज्याचे परिवहन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्या आदेशान्वये विभाग नियंत्रक अजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे नियोजन करण्यात आले आहे.
येरमाळा येथील येडेश्वरी यात्रेसाठी स्वतंत्र 151 जादा बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये धाराशिव आगारातून 30, तुळजापूर 31, उमरगा 10, परंडा 20, भूम 30 आणि कळंब आगारातून 30 बसेसचा समावेश आहे.
तसेच चैत्री पंढरपूर, शनि शिंगणापूर व तुळजापूर यात्रांसाठी स्वतंत्र 55 जादा बसेसची सोय करण्यात आली आहे. यात धाराशिव 10, तुळजापूर 12, उमरगा 5, कळंब 12, भूम 10 आणि परंडा 6 बसेसचा समावेश आहे.
चैत्री पंढरपूर-शिंगणापूर यात्रा 27 मार्च 2026 ते 1 एप्रिल 2026 दरम्यान होणार असून तुळजापूर-येडेश्वरी येरमाळा यात्रा 1 एप्रिल ते 5 एप्रिल 2026 दरम्यान पार पडणार आहे. मुख्य दिवस 2 एप्रिल (पौर्णिमा) व 3 एप्रिल या कालावधीत मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी अपेक्षित आहे.
यात्राकाळात प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन वाहतुकीचे नियोजन, अतिरिक्त फेऱ्या, चालक-वाहकांची उपलब्धता तसेच यांत्रिक तपासणी यावर विशेष भर देण्यात आला आहे. विभागीय वाहतूक अधिकारी व यांत्रिक विभाग यांच्यात समन्वय साधून सर्व बसेस सुरक्षित आणि वेळेवर धावतील याची दक्षता घेतली जात आहे.
विभाग नियंत्रक अजय पाटील यांनी सर्व आगार व्यवस्थापकांना आवश्यक सूचना देत यात्रेकरूंना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी काटेकोर नियोजन केले आहे.
दरम्यान, या अतिरिक्त फेऱ्यांमुळे एसटी महामंडळाच्या उत्पन्नातही वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत असून यात्राकाळ हा केवळ सेवा नव्हे तर व्यवसायवृद्धीचीही संधी ठरत आहे.
भाविकांना सुरक्षित, सुलभ आणि वेळेवर प्रवास सेवा देण्यासोबतच एसटी महामंडळ आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दिशेने हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786













