एस.टी. प्रवासाचा नवा डिजिटल युगारंभ – परिवहनमंत्री प्रताप सरनाईक
मुंबई लोकमदत न्यूज
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एस.टी.) प्रवास व्यवस्थेत डिजिटल परिवर्तन घडवत ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ (NCMC) प्रणाली लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या माध्यमातून रोख व्यवहारांऐवजी पारदर्शक, सुरक्षित आणि सुलभ सेवा देण्यात येणार असल्याची माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
या नव्या प्रणालीमुळे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग प्रवासी, पत्रकार तसेच विविध सामाजिक सवलतींचा लाभ घेण्यासाठी स्मार्ट कार्ड अनिवार्य असणार आहे. या प्रकल्पासाठी महामंडळाने मे. ईबिक्स टेक्नोलॉजिस लि. आणि NSDL पेमेंट्स बँक यांच्याशी करार केला असून, लवकरच राज्यभरातील सर्व आगारांमध्ये नोंदणी मोहीम सुरू होणार आहे.
एस.टी. महामंडळाच्या या निर्णयामुळे तिकीटासाठी रोख रक्कम व सुट्या पैशांची अडचण दूर होणार असून, एका स्मार्ट कार्डच्या साहाय्याने प्रवास अधिक सोयीस्कर, सुरक्षित आणि पारदर्शक होणार आहे. पारंपरिक प्रवास व्यवस्थेला डिजिटल स्पर्श देणारा हा महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे मंत्री सरनाईक यांनी नमूद केले.
कार्डची वैशिष्ट्ये :
नवीन कार्डाची किंमत ₹१९९ (GST सह) असून, जुने स्मार्ट कार्ड जमा केल्यास ते ₹१४९ मध्ये उपलब्ध होणार आहे. वॉलेटमध्ये किमान ₹१०० रक्कम ठेवता येणार असून ₹५० च्या पटीत रिचार्ज करता येईल. ईटीआयएम मशीन, अधिकृत संकेतस्थळ, मोबाईल ॲप तसेच नियुक्त एजंटकडून रिचार्ज सुविधा उपलब्ध असेल. ज्येष्ठ नागरिक व महिलांच्या सोयीसाठी ३,००० हून अधिक अधिकृत एजंट नियुक्त करण्यात आले असून, बसस्थानकांवरच नोंदणी प्रक्रिया पार पडणार असल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक अमजद सय्यद 8390088786












