सहलीवरच रंगली विजयाची होळी १३ मार्चपूर्वीच महायुतीचा जल्लोष!
जि.प.अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीआधीच गुलाल उधळला, जिल्हा परिषदेत कमळ फुलणार असल्याचे स्पष्ट संकेत
धाराशिव | लोकमदत न्यूज
धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल लागून जवळपास महिना उलटत असताना सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. ७ फेब्रुवारीला मतदान व ९ फेब्रुवारीला निकाल जाहीर झाल्यानंतर संभाव्य फुटफुटीचा धोका टाळण्यासाठी महायुतीचे नवनिर्वाचित सदस्य अज्ञातस्थळी सहलीवर पाठवले आहेत. सत्तेची समीकरणे जुळवण्यासाठी सुरू असलेल्या या हालचालींमध्ये होळीचा रंगही मिसळला असून, सहलीवर असलेल्या सदस्यांनी एकमेकांना गुलाल लावत विजयाची होळी (धुळवड) मोठ्या उत्साहात साजरी केली. या रंगोत्सवाचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, सदस्यांमधील एकजूट स्पष्ट दिसून येत आहे.
१३ मार्च रोजी अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर फोडाफोडीचे राजकारण टाळण्यासाठी आणि आपला गट अभेद्य राखण्यासाठी महायुतीने सदस्यांना थेट निवडीच्या दिवशीच सभागृहात आणण्याची रणनीती आखल्याचे बोलले जाते. निकालानंतर स्पष्ट बहुमत मिळाल्यापासून सदस्य फुटू नयेत, यासाठी खबरदारी घेतली जात असल्याची चर्चा जिल्ह्यात रंगली आहे.
दरम्यान, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी तथा भाजपच्या जिल्हा परिषद सदस्या अर्चनाताई पाटील अध्यक्षपदी विराजमान होणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. तर महाविकास आघाडी प्रभाव टाकण्याच्या स्थितीत नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत पहिल्यांदाच ‘कमळ’ फुलण्याचे संकेत मिळत आहेत.
निवडणुकीनंतर सदस्यांना एकत्र ठेवण्याचे नियोजन काटेकोरपणे राबवण्यात आल्याचे सांगितले जात असून, १३ मार्चला होणाऱ्या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. तोपर्यंत सहलीवरील राजकीय हालचाली आणि विजयाचा जल्लोष सुरूच राहणार, असे चित्र सध्या दिसून येत आहे.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786












