‘कला केंद्रां’च्या आड अनैतिक कारभार? विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
पिंजरा, महाकाली, साई कला केंद्रांवर गंभीर आरोप; महिलांना जबरदस्ती व अल्पवयीन मुलींचा संशय – राज्यभर तपासणीचे निर्देश देण्याची मागणी
धाराशिव | लोकमदत न्यूज
धाराशिव जिल्ह्यात कला केंद्रांच्या नावाखाली सुरू असलेल्या कथित अनैतिक प्रकारांमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्य विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देत तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
डॉ. गोऱ्हे यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, धाराशिवसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी स्तरावर देण्यात आलेल्या कला केंद्रांच्या परवान्यांचा गैरवापर होत असून लोककलेच्या नावाखाली अनैतिक व्यवसाय सुरू असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. विशेषतः धाराशिव जिल्ह्यातील पिंजरा, महाकाली आणि साई कला केंद्र या ठिकाणी महिलांना जबरदस्तीने या व्यवसायात ढकलले जात असल्याचे आरोप करण्यात आले आहेत.
या प्रकरणातील गंभीर बाब म्हणजे काही ठिकाणी अल्पवयीन मुलींना फसवून आणले जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, यामागे मानवी तस्करीसारखा गुन्हेगारी अँगलही असू शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी होणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
दरम्यान, इतर जिल्ह्यांप्रमाणेच काही ठिकाणी गुन्हे दाखल होऊन परवाने रद्द करण्याची कारवाई झाली असली, तरी धाराशिवमध्ये अशा प्रकारांवर अद्याप ठोस आणि व्यापक कारवाई झालेली दिसून येत नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व कला केंद्रांची महिला पोलीसांच्या माध्यमातून अचानक व वारंवार तपासणी करण्यात यावी, तसेच ज्या ठिकाणी अनैतिक प्रकार आढळतील त्यांचे परवाने तात्काळ रद्द करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी डॉ. गोऱ्हे यांनी केली आहे.
या संपूर्ण प्रकरणामुळे “कला केंद्र” या संकल्पनेलाच धक्का बसत असून खऱ्या लोककलावंतांच्या प्रतिमेलाही फटका बसत आहे. त्यामुळे महिला सुरक्षितता आणि कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने शासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी आता जोर धरत आहे.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786












