संविधानिक मूल्यांचे पालन करून राष्ट्रनिर्मितीत योगदान द्यावे – पालकमंत्री प्रताप सरनाईक
७७ व्या प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा…३ हजार विद्यार्थ्यांची देशभक्ती गीतांवर सामूहिक कवायत
धाराशिव दि.२६ जानेवारी (प्रतिनिधी) देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या स्वातंत्र्यवीरांना अभिवादन करत पालकमंत्री श्री.सरनाईक यांनी जिल्ह्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या.ते पुढे म्हणाले की,छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या प्रेरणेतून प्रेरित होऊन असंख्य वीरांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध संघर्ष केला.अपार यातना सहन करत त्यांनी देशासाठी प्राणांची आहुती दिली.या सर्व थोर स्वातंत्र्यसैनिकांचे बलिदान भारताच्या स्वातंत्र्य व प्रजासत्ताक व्यवस्थेचा पाया असल्याचे त्यांनी सांगितले.
आज पोलीस कवायत मैदान क्र.२ येथे ७७ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाचे मुख्य शासकीय ध्वजारोहण केल्यानंतर उपस्थिताना संबोधित करताना सरनाईक बोलत होते. यावेळी स्वातंत्र्य सैनिक बुबासाहेब जाधव,भास्करराव नायगावकर,नामदेव माने,श्रीपती जावळे,बाबुराव तवले,शेषराव बनसोडे,कलावती उंबरे, जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष,पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर,अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील,जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश काळे,अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना व निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली भारतीय राज्यघटना ही देशाला मिळालेली सर्वात मौल्यवान देणगी असून २६ जानेवारी १९५० रोजी स्वीकारलेली ही राज्यघटना कोट्यवधी नागरिकांच्या स्वप्नांचे व आत्मसन्मानाचे प्रतिबिंब आहे,असे सांगून पालकमंत्री श्री.सरनाईक पुढे म्हणाले की,या राज्यघटनेमुळे भारत सार्वभौम,समाजवादी,धर्मनिरपेक्ष व लोकशाही प्रजासत्ताक म्हणून जगात ओळखला जात असून स्वातंत्र्य, समता,बंधुभाव व सामाजिक न्याय या मूल्यांवर देशाची उभारणी झाली आहे.जात,धर्म,लिंग वा भाषा यांचा भेद न करता प्रत्येक नागरिकाला सन्मानाने व सुरक्षिततेने जगण्याचा अधिकार राज्यघटनेने दिला असल्याचे त्यांनी सांगितले.
सरनाईक पुढे म्हणाले की,राज्य सरकार मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली सर्वसमावेशक विकास, सामाजिक न्याय व सुशासन या त्रिसूत्रीवर कार्यरत असून राज्य प्रगतीपथावर आहे.आजच्या प्रजासत्ताक दिनी प्रत्येक नागरिकाने संविधानिक मूल्यांचे पालन करण्याची,राष्ट्रीय एकात्मता जपण्याची व आपली कर्तव्ये निष्ठेने पार पाडण्याची शपथ घ्यावी. भ्रष्टाचारमुक्त प्रशासन, पर्यावरण संवर्धन,सामाजिक सलोखा व राष्ट्रप्रेम हीच उज्ज्वल भविष्यासाठी खरी ताकद असून जिल्ह्याच्या विकासासाठी अहोरात्र परिश्रम करणाऱ्या सर्व अधिकारी-कर्मचारी व सजग नागरिकांचे त्यांनी अभिनंदन केले.
प्रारंभी पालकमंत्री सरनाईक यांनी राष्ट्रध्वजारोहण करून ध्वजाला मानवंदना दिली.यावेळी पोलीस बँड पथकाने राष्ट्रगीत व राज्य गीत सादर करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.
पालकमंत्री सरनाईक यांनी परेडचे निरीक्षण केले.पोलीस परेडचे संचलन भारतीय पोलीस सेवेतील परिविक्षाधीन अधिकारी श्रीमती. मेघना आर्यन यांनी केले.परेडमध्ये पोलीस पुरुष- महिला,गृह रक्षक दल,एनसीसी, पोलीस बँड पथक, तुळजापूर सैनिक स्कूलचे विविध शाळांचे एनसीसी पथक तसेच स्काऊट गाईडचे पथक सहभागी झाले होते.यावेळी पोलिसांचे वज्र,शीघ्र कृती दल,श्वान कॅप्टन, बेवारस वस्तूपासून सावधान,दंगल नियंत्रण पथक,आपत्ती व्यवस्थापन दलाचा चित्ररथ,वन विभाग,कृषी विभाग,१०८ रुग्णवाहिका, अग्निशमन दल चित्ररथाच्या माध्यमातून सहभागी होते.
शालेय शिक्षण विभागाने पुढाकार घेऊन शहरातील विविध शाळांच्या ३००० विद्यार्थ्यांनी देशभक्तीवरील गीतांवर सामूहिक कवायत सादर केली.तसेच पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी लेझीम कवायत सादर केली.
यावेळी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.बालविवाह न करण्याची प्रतिज्ञा आणि कॉपीमुक्त जिल्ह्याची उपस्थितांना शपथ देण्यात आली.
कार्यक्रमाला उपजिल्हाधिकारी शिरीष यादव,संतोष राऊत,प्रवीण धरमकर,स्वाती शेंडे,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय चाकूरकर,उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.कुंभार,जिल्हा परिषदेचे मुख्य वित्त लेखा अधिकारी सचिन इगे,जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री.मोरे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक हर्षवर्धन शिंदे,सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शिवराम केत,समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त सचिन कवले,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सतीश हरिदास, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सुधा साळुंखे तसेच विविध विभागाचे प्रमुख अधिकारी व कर्मचारी,नागरिक,पत्रकार बांधव व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन हनुमंत पडवळ यांनी केले.
















